सातव्या दिवशीही नागरिकांची ससेहोलपट
By Admin | Updated: November 16, 2016 04:42 IST2016-11-16T04:42:48+5:302016-11-16T04:42:48+5:30
पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी सातव्या दिवशीही नागरिकांची त्रेधातिरपीट सुरूच आहे.

सातव्या दिवशीही नागरिकांची ससेहोलपट
श्रीवर्धन : पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी सातव्या दिवशीही नागरिकांची त्रेधातिरपीट सुरूच आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बँकांमध्ये प्रचंड गर्दी असून आजच्या सातव्या दिवशीही पैसे भरण्यासाठी बँकांमध्ये भली मोठी रांग लागली होेती. रायगड जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये एक हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्दचा विपरीत परिणाम बाजारपेठेवर झाला आहे, मात्र याचा सर्वाधिक फायदा ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका व महानगरपालिकांना झाला आहे. श्रीवर्धन नगरपालिकेने करापोटी आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त कर जमा केला आहे.
घरपट्टी, पाणीपट्टी, वृक्षकर, रोजगार हमी कर, पाणी नळजोडणी, पाणीपुरवठा अनामत, रस्ता खुदाई शुल्क, सरकारी शिक्षण कर आदी करापोटी श्रीवर्धन नगरपालिकेत आतापर्यंत १५ लाखांपर्यंत रक्कम जमा झाली आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली असली तरी यातून काळा पैसा बाहेर येणार आहेच, पण सर्वसामान्यांचे मात्र हाल झाले आहेत. ५०० च्या नोटा स्वीकारत नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये बालकांनाही प्राण गमवावे लागत आहेत. या चिंतेने आता वृध्दांनी, महिलांनी रांगांचा धसका घेतला आहे. सरकारने यावर त्वरित उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. पैसे स्वीकारण्यासाठी बँकांमध्ये जादा काऊंटर सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)