नीरा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाची वाहने अडवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:12 AM2020-12-22T04:12:15+5:302020-12-22T04:12:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सणसर : नीरा भीमा नदी जलस्थीरिकरण प्रकल्पासाठी खोदण्यात येणाऱ्या बोगद्यातील भूसुरंगाच्या स्फोटांमुळे घरांना तडे गेले आहे, ...

Vehicles of Nira-Bhima water stabilization project blocked | नीरा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाची वाहने अडवली

नीरा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाची वाहने अडवली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सणसर : नीरा भीमा नदी जलस्थीरिकरण प्रकल्पासाठी खोदण्यात येणाऱ्या बोगद्यातील भूसुरंगाच्या स्फोटांमुळे घरांना तडे गेले आहे, तर अनेक विहिरींचे पाणी आटल्याने सपकाळवस्ती ग्रामस्त आक्रमक झाले आहे. रविवारी काम बंद पाडल्यावर सोमवारी पुन्हा प्रकल्पाची वाहने आल्याने ग्रामस्थांनी ती रस्त्यातच अडवून पुन्हा काम बंद पाडले.

मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील नीरा नदी वरून बोगद्याद्वारे उजनी धरण व तेथून पुढे पाणी मराठवाड्यासाठी वळविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे बोगद्याचे काम सध्या सणसर (ता.इंदापुर) येथील ३६ फाटा येथे सुरू आहे. या प्रकल्पामुळे या परिसरातील सपकळवाडीत गावात अनेकांच्या घरांना तडे गेले. तर या परिसरातील विहिरींचे पाणी आटल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत रविवारी प्रकल्पाच्या बांधकाम ठिकाणी जात काम बंद पाडले होते. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनीही हे काम बंद करत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. मात्र, सोमवारी सकाळी मुरुमाने भरलेले ट्रक हे प्रकल्पाच्या ठिकाणावरून मुरूम यार्डाकडे भरून नेत असतांना ग्रामस्थांनी पाहिले. ग्रामस्थांनी तात्काळ एकत्र येत वाहनांच्या पुढे येत ती अडवली. वाहने पुढे नेऊ नका असे म्हणत ग्रामस्थ ट्रक पुढे झोपण्याचा प्रयत्न केला. रविवारी प्रकल्पाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही संबंधित ठेकेदार शेतकऱ्यांना न जुमानता पुन्हा काम सुरू केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी उमेश सपकळ,जगदीश सपकळ, आप्पा सपकळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

नीरा-भीमा जल स्थिरीकरण प्रकल्पाच्या कामासाठी भूसुरुंगाचा वापर केला जात आहे. त्याच्या हादऱ्यामुळे परिसरातील घरांना तडे जात असून नुकसान होत आहे. बोगद्यामुळे आमच्या विहिरींचे व बोअरवेलचे पाणी गेले आहे. हिवाळ्यातही विहिरींना पाणी कमी झाले आहे. त्यावरून हे आंदोलन सुरू आहे. या विषयी रविवारी ग्रामस्थांनी सर्व अधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. मात्र शेतकऱ्यांचा विरोध डावलून काम सुरू करण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून सुरू आहे.

कोट

रविवारी ग्रामस्थांच्या आंदोलनांनतर ठेकेदारांनी प्रकल्पाचे किंवा तेथील यंत्रसामुग्रीचे नुकसान होणार नाही ती कामे सुरू ठेवण्यात येईल असे सांगितले होते. बोगद्यातील पाणी काढणे गरजेचे असल्याने ते काम सुरू ठेवावे. मात्र, बोगद्यातील काढलेला मुरूम तसाच ठेवावा, अशा सूचना दिल्या होत्या. असे असतांही साेमवारी सकाळी मुरुमाने भरलेली वाहने मुरूम यार्डा कडे जात होती. ठेकदेदाराने फसवणूक केल्यामुळे ग्रामस्थांनी अडविली. अधिकाऱ्यांनी आमचा संयम तुटू देऊ नये. अन्यथा आंदोलनाला वेगळे वळण लागेल.

-सचिन सपकळ, सरपंच, सपकळवाडी

फोटो ओळ : नदीजोड प्रकल्पाची मुरुमाने भरलेली वाहने अडवतांना सपकळवाडी येथील शेतकरी.

Web Title: Vehicles of Nira-Bhima water stabilization project blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.