पिंपरी : पोलिस आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, असे वाटत असल्याने वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेला नीलेश चव्हाण निश्चिंत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला पकडले. पोलिसांना पाहताच त्याची भंबेरी उडाली. ‘साहेब, मला अस्वस्थ वाटतंय...’ असे त्याने पोलिसांना सांगितले.पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विविध पथकांकडून नीलेशचा शोध सुरू झाला. गुन्हे शाखा, सायबर पोलिस यांच्यासह बावधन पोलिसही मागावर होते. त्याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना चकवा देण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या. यात मोबाइल फोन बंद ठेवणे, कोणाशीही संपर्क न ठेवणे, सतत ठिकाण बदलत राहणे, असे तो करत होता.
सोशल मीडियावरून घेत होता माहिती
त्याने पलायन काळात तीन मोबाइल फोनचा वापर केला आहे. या फोनवरून तो सोशल मीडियाद्वारे या प्रकरणातील माहिती जाणून घेत होता. त्याच्यावर दाखल गुन्ह्याबाबतही तो माहिती घेण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकरणाशी संबंधित यू-ट्यूबवरील व्हिडिओ तो पाहत होता.
विमानाने आणले शहरात
नीलेशकडे रोख स्वरूपात असलेली रक्कम तो खर्च करत होता. मात्र, ती जास्त दिवस रहावी म्हणून तो जपून खर्च करत होता. त्यासाठी कमी दर असलेल्या हाॅटेलमध्ये तो राहात होता. पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्यासारखे नीलेशने सांगितले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला थेट विमानाने शहरात आणले.
नीलेश चव्हाणचा माग कसा काढला?
- २५ मे रोजी दिल्ली ते गोरखपूरदरम्यान नीलेशने खासगी बसने प्रवास केला. तांत्रिक तपासात हे लोकेशन ट्रेस झाले. बसच्या सीसीटीव्हीने यावर शिक्कामोर्तब केले.- गोरखपूरमध्ये जिथे उतरला, त्यापुढे तो कुठे गेला, हे सीसीटीव्हीद्वारे ट्रेस केले.- पुढचे दोन-तीन दिवस शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर तो नेपाळला गेल्याचे आढळले.- ३० मे रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस भारत-नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशच्या सोनोली येथे पोहोचले. तेथे त्याच्या मुसक्या आळवल्या.