इंदापूर : गेल्या ३४ वर्षांपासून उजनी धरणात १४.९६ टीएमसी गाळ साठला आहे. तो काढला गेल्यास तेवढ्याच प्रमाणात धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. त्या पाण्याचा उपयोग धरणाच्या मूळ सिंचन आराखड्यात असणाऱ्या; मात्र गेली दहा ते बारा वर्षे सिंचनापासून वंचित असणाऱ्या मंगळवेढा, दक्षिण सोलापूरच्या टप्प्यातील १९ हजार हेक्टर कोरडवाहू क्षेत्रास होणार आहे. तथापि, गाळ काढण्यास धरणक्षेत्रातील शेतकरी व मच्छीमारांचा विरोध आहे. त्यामुळे सन २०११-१२ च्या सुमारास गाळ काढण्याच्या प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, आजच्या घडीला गाळामुळे धरणाच्या पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होत आहे. प्रतिकूल परिणाम टाळण्याकरिता, गाळ काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणे अपरिहार्य आहे,अशी वस्तुस्थिती आहे. उजनी धरणाची मुळची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी आहे. सन १९७७ ला पहिल्यांदा धरणात पाणी अडविण्यात आले. सन १९८० मध्ये पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्यात आले होते. मागील ३४ वर्षांत धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. शासनाच्या ‘मेरी’ या नाशिक येथील संस्थेने सन २००२ मधे धरणातील गाळाचा अभ्यास केला. त्या काळात त्या संस्थेच्या अहवालानुसार धरणात ८.५८ टीएमसी गाळ साठल्याचे निदर्शनास आले होते. याच संस्थेने सन २००७ मध्ये पुन्हा गाळाचे सर्वेक्षण केले. त्या वेळी गाळाचे प्रमाण ८.४० टीएमसी होते. नोव्हेंबर २०११ मध्ये नवी दिल्ली येथील केंद्रीय जल आयोगाने ‘टुजो विकास’ या संस्थेच्या माध्यमातून,जीपीएस पद्धतीने गाळाचे फेरसर्वेक्षण केले. त्याचा अंतिम अहवाल मार्च २०१२ ला शासनास सादर केला, त्या वेळी धरणात १४.९६ टीएमसी गाळ साठला असल्याचे स्पष्ट झाले. यापैकी ४ टीएमसी गाळ हा धरणातील उपयुक्त साठ्यात, तर ११.९६ टीएमसी गाळ मृत साठ्यात असल्याचे ही निष्पन्न झाले. साठलेल्या गाळाचा धरणांमधून कालवा व बोगद्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. गाळामुळे साठवणुकीत घट झाली आहे. प्रकल्पिय तरतुदी नुसार गृहीत धरलेले सिंचन होत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी गाळ काढणे अपरिहार्य आहे. धरणाचा पसारा व विस्तार पाहता, हे काम सोपे नाही. स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध, बऱ्याच ठिकाणचा रस्त्यांचा अभाव आहे. जलवाहिनींचे जाळे, गाळ काढण्याऐवजी आत्ता काळ्या सोन्याचे मोल आलेली जलसाठ्यात खोलवर दडलेली वाळू उपसण्याकडेच असणारा कल, गाळ कोठे टाकायचा, हा उभा ठाकलेला प्रश्न ही सारी आव्हाने समोर आहेत. गाळ काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा लागणार आहे. उजव्या व डाव्या तीरावर सहा ते सात ठिकाणी टप्पे करावे लागणार आहेत. गाळपेर क्षेत्र कसणाऱ्या शेतकऱ्यांचा विरोध मोडीत काढण्यासाठी उपाय करावे लागणार आहेत. उजनी धरणास स्वत:चे असे हक्काचे पाणलोट क्षेत्र नाही. त्या बाबतीत उजनी परावलंबी धरण आहे. दौंड ते उजनीपर्यंतच्या भागात अत्यल्प पाऊस पडतो. मावळ व भीमाशंकर खोऱ्यात समाधानकारक पाऊस झाला तरच उजनी भरते, अशी परिस्थिती आहे.
उजनीत १४.९६ टीएमसी गाळ
By admin | Updated: February 3, 2016 01:18 IST