पुणे : पुणे शहर आणि परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील लवासा येथील बंधाऱ्यात बोटिंगचा आनंद लुटला जात आहे. लवासा प्रकल्पाची पाण्याची सोय व्हावी, यासाठी वरसगाव धरणात सध्या दोन बंधारे बांधण्यात आले आहेत. जुलै महिना उजाडला तरी धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने मंगळवारी पानशेत आणि वरसगाव धरणांची पाहणी केली. वरसगाव धरणाच्या मुख्य भिंतीलगतच लवासा प्रकल्पात जाण्यासाठी रस्ता आहे. सुमारे ३० किलोमीटर धरण पाणलोट क्षेत्रानंतर लवासाचा प्रकल्प येतो. दासवे येथे पहिला बंधारा आहे. या बंधाऱ्याची क्षमता ६५ दशलक्ष घनफूट इतकी आहे. या बंधाऱ्यातील ०.१५ दशलक्ष घनफूट पाणी धरणात सोडलेले आहे. या बंधाऱ्यातच बोटिंग केले जाते. या बंधाऱ्याच्या पुढे आणखी एक बंधारा आहे. त्याची क्षमता १४० दशलक्ष घनफूट आहे. त्यातील सर्व पाणी सोडून देण्यात आले असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशोक गायकवाड म्हणाले, ‘लवासा सिटीसाठी एकूण दहा बंधारे बांधण्याची परवानगी आहे. त्यातील आठ बंधारे वरसगावशी संबंधित आहेत. करारानुसार आवश्यकतेवेळी शंभर टक्के पाणी पाटबंधारे विभाग घेऊ शकतो. सध्या उपलब्ध पाणी सोडण्याची सूचना केली आहे.’ (प्रतिनिधी)
वरसगाव धरणाने गाठला तळ; लवासात मात्र बोटिंगची मौज
By admin | Updated: July 3, 2014 05:52 IST