शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविणार
By admin | Published: January 12, 2017 02:14 AM2017-01-12T02:14:51+5:302017-01-12T02:14:51+5:30
प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख भरतीसंदर्भात ४०-३०-३० या फॉर्म्युल्यामध्ये दुरुस्ती करून ७० टक्के पदे सरळ सेवेने
राजगुरुनगर : प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख भरतीसंदर्भात ४०-३०-३० या फॉर्म्युल्यामध्ये दुरुस्ती करून ७० टक्के पदे सरळ सेवेने, तर ३० टक्के पदोन्नतीने प्राथमिक शिक्षकांमधूनच भरण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे ग्रामविकास सचिव डॉ. असीम गुप्ता यांनी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या शिष्टमंडळाला दिले.
मुंबई येथे मंत्रालयामध्ये ग्रामविकास सचिवांच्या दालनामध्ये डॉ. गुप्ता यांच्याशी झालेल्या बैठकीत ही चर्चा झाली. या वेळी मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड, संघटनेचे राज्याध्यक्ष दत्तात्रय सावंत, कार्याध्यक्ष चंद्रकांत दामेकर, सरचिटणीस उमेश गोदे, नांदेड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
या वेळी झालेल्या चर्चेत सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी केंद्रपमुख भरतीसाठी वयाची अट रद्द करण्यात येईल, सध्या कार्यरत असलेल्या अभावित केंद्रप्रमुखांना संरक्षण देण्यात येईल. सन २०१४नंतर नियुक्त विषय शिक्षकांना ‘समान काम, समान दाम’ या न्यायाने सहावी ते आठवीच्या विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यास मान्यता देण्यात आली. बदली प्रक्रियेमध्ये योग्य दुरुस्ती करण्याचे आश्वासन, विद्यार्थिसंख्येनुसार केंद्रप्रमुख पदे तयार करण्यात येतील. केंद्रप्रमुखांना फिरती भत्ता देण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली.
या शिष्टमंडळामध्ये सांगलीचे अध्यक्ष ज्ञानदेव भोसले, नांदेडचे अध्यक्ष शंकरराव इंगळे, राज्य सल्लागार विठ्ठल धनाईत, पुणे विभागीय अध्यक्ष सोपानराव धुमाळ, पुणे जिल्हाध्यक्ष अनिल पलांडे, संजय वाघ, शांताराम नेहेरे उपस्थित होते.(वार्ताहर)