भोर : गेल्या दोन तीन दिवसांपासून शहराला गाळमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. नगरपालिकेकडूनही यावर कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने साथीचे आजार परसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण होऊनही शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वी ९० एचपी व ५० एचपीच्या दोन मोटर तसेच एक डीआय पाईपलाईन, एक सिमेंट पाईपलाईन होती. पैकी सिमेंट पाईपलाईन खराब झाल्यामुळे सारखी फुटत असल्याने दररोज नियमित पाणी शहरातील नागरिकांना मिळत नव्हते. त्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांनी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत नगरपालिकेला सुमारे १३.५० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मात्र सदर योजनेचे काम संथ गतीने सुरु होते. त्यामुळे काम होण्यास उशिरा झाला होता. शहरातील जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून ३.५ एमएलडीच्या जलशुध्दीकरण (फिल्टरचे) कामही पूर्ण झाले आहे. तर सुमारे २० लाख लिटर पाण्याच्या टाकीसाठी ७३ लाख रुपये निधी मंजूर असून कामही सुरु आहे.
मागील दोन महिन्यांपासून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र स्वच्छ आणि उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नसून गाळमिश्रित पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. संततधार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणातून मोठ्या प्रमाणात गाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे.
पाणी उकळून पिण्याचे आवाहन
भोर शहराला जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्यावर प्रक्रिया करूनच पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु, धरणातून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात गाळमिश्रित असल्याने प्रक्रिया करूनही थोड्याफार प्रमाणात पाणी गढूळ येत असेल. येत्या तीन चार दिवसांत शुध्द पाणीपुरवठा सुरु होईल. तोपर्यंत नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन नगराध्यक्षा निर्मला आवारे व उपनगराध्यक्ष अमित सागळे यांनी केले आहे.
२१ भोर