‘अनाथांची माय’ म्हणून सिंधुताई सपकाळ यांना ओळखले जाते. आईच्या विरोधामुळे आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे लहानपणी सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर देखील त्यांचा संघर्ष संपला नाही. त्यांना घर सोडावे लागले. गोठ्यात मुलीला जन्म द्यावा लागला. रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकावर त्यांना भीक मागावी लागली. स्वतःला आणि मुलीला जगविण्याचा त्यांचा पुन्हा संघर्ष सुरू झाला. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईनी आपल्या जीवनाचे धडे घेत महाराष्ट्रात अनाथांसाठी सहा अनाथाश्रम स्थापन केले त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. त्यांच्यामार्फत चालविल्या जाणार्या संस्थांनी असहाय्य आणि बेघर महिलांना मदत केली. आजवर सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.“मी सिंधुताई सपकाळ” या सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित चित्रपटाची ५४ व्या लंडन चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियरसाठी निवड करण्यात आली.
कोट
मी कधी कल्पना केली नाही असं काहीतरी घडलं आहे. मला फक्त जगायचं आणि जगवायचं होतं. एवढाच फक्त माझा उद्देश होता. माझी लेकरं, लोकांनी दिलेला आधार आणि माझ्या कार्याची वेळोवेळी दखल घेत, सहकार्य करीत कामाला सन्मान प्राप्त करून देणाऱ्या ‘लोकमत’ला देखील मी ही ‘पद्मश्री’ समर्पित करत आहे.
- सिंधुताई सपकाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
....