लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले असून, पुण्यात झालेल्या साखर संकुलातील बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंद दाराआड बराच वेळ खलबते केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, जयंत पाटील यांनी तिघांमध्ये अशी चर्चा किंवा बैठक झाली नसल्याचे एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रविवारी दुपारी दोन वाजता पुण्यातील साखर संकुलात एआय तंत्रज्ञानाबाबत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीला दोघेही शेजारी बसले होते. राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील वगळता सर्व नेते बाहेर पडले. केवळ शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील बैठकीच्या रूममध्ये बसून होते. यावेळी तीनही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती समजू शकलेली नाही. गेल्या ५५ दिवसांत काका-पुतण्याची ही पाचवी भेट आहे.