लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशाच्या प्रगतीत जाती व धर्मव्यवस्था हा मोठाच अडथळा आहे. तो दूर करायचा असेल तर आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह हा प्रभावी मार्ग आहे. मात्र त्यामुळेच अशा विवाहांना प्रखर विरोध आजही केला जातो. त्यांना बळकट आधार देणारी व्यवस्था निर्माण केली तर यात फरक पडू शकतो. परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून अशी व्यवस्था उभी राहील, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांनी व्यक्त केला.शनिवार पेठ येथील स्नेहसदन सभागृह येथे परिवर्तन मिश्र विवाह संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेचे प्रमुख विलास वाघ, संचालक विशाल पोखरकर, जुली थॉमस, अरुणा तिवारी, सुप्रिया राख, राजन दांडेकर, क्रांती पोतदार, संदीप शिंदे, अर्चना पिंपळकर, डॉ. नितीन हांडे, मेघा हांडे आदी या वेळी उपस्थित होते. आंतरजातीय विवाहांना होणारा विरोध हा क्षणिक नसतो. त्यामुळे अशा विवाहितांना आधार, मदत, करण्यासाठी सपोर्ट सिस्टीम अर्थात बळकट आधार यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. अलीकडे आंतरजातीय विवाहांना पाठिंबा देण्यासाठी काही संस्था काम करत आहेत. पण या संस्था-संघटनांनी अजून व्यापकपणे काम करण्याची गरज आहे, असे पवार यांनी सांगितले. ही सर्व दांपत्ये भविष्यातील आदर्श समाजाची आजची प्रतीके आहेत असे या वेळी सांगण्यात आले. सर्वांचा वाघ व अन्य मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
आंतरधर्मीय विवाहितांना सलाम
By admin | Updated: May 9, 2017 03:56 IST