'रिस्क है तो इश्क है' म्हणणाऱ्यांना ‘राईट टू लव्ह‘ मिळवून देणाऱ्या पुण्यातल्या तरुणांची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 03:36 PM2021-02-14T15:36:34+5:302021-02-14T15:36:54+5:30

ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे. एक आग का दरिया है और डूब के जाना है.. असं म्हटलं जातं.. प्रेम करताना कुटुंब, समाजाकडून अडचणी येतात.. त्या सोडवण्याचं काम पुण्यातील एक गट करतोय..

Right to Love story of a pune group which works for right of couples | 'रिस्क है तो इश्क है' म्हणणाऱ्यांना ‘राईट टू लव्ह‘ मिळवून देणाऱ्या पुण्यातल्या तरुणांची गोष्ट

'रिस्क है तो इश्क है' म्हणणाऱ्यांना ‘राईट टू लव्ह‘ मिळवून देणाऱ्या पुण्यातल्या तरुणांची गोष्ट

googlenewsNext

- के. अभिजीत

व्हॅलेंटाईन डे च्या आधीचा एक दिवस.. आमची राईट टू लव्हने घेतलेल्या एका कार्यक्रमाची तयारी सुरु होती. त्यातच फोन आला.. एका प्रेमविवाह केलेल्या जोडप्याला मदत हवी होती. त्यांना भीती वाटत होती की घरचे - पोलीस त्रास देतील काय? झालं.. हातची सगळी कामे सोडून आमची फोनाफोनी सुरु झाली. कार्यकर्ते मदतीला धावले. पोलिस स्टेशनमध्ये गेले. हेतू एकच हे जोडपं सुखरुप रहावं.. 

राईट टू लव्हकडे आलेल्या अनेक जोडप्यांपैकीच हे एक. राईट टू लव्हचे काम सुरू करून पाच वर्षे पूर्ण झाली. या पाच वर्षांत आमच्या कामगिरीचा आलेख कसा आहे माहीत नाही, पण जे केलंय, जे करतोय ते प्रामाणिक आणि निस्वार्थी आहे एवढंच...

2014 डिसेंबर मध्ये एका जोडप्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ बघितला. पोटात गोळा आला. फार अस्वस्थ वाटायला लागलं. एवढ्या वाईट पद्धतीने त्यांना मारहाण केली होती. नेहमीप्रमाणे काय करणार म्हणून मनातली अस्वस्थता, चीड फेसबुकवर पोस्ट केली. संकृती रक्षणाच्या नावाखाली मारहाण करणाऱ्यांचा निषेध करायला हवा एवढी प्रामाणिक भूमिका त्यात स्पष्ट होती.

प्रत्येकजण फक्त पोस्ट लाईक करत होता. त्याचा निषेध मात्र कोणी व्यक्त केला नाही. दुसऱ्या दिवशी सुशांत भेटला. संबंधित घटनेच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यासंबधी चर्चा झाली. रानडेतल्या काही मित्र मैत्रिणींबरोबर या घटनेच गांभीर्य आणि मोर्चा बद्दल चर्चा केली. सगळ्यांनी सहमती दर्शवली. दोन चार मीटिंगमध्ये सगळी तयारी झाली. या रॅलीसाठी पोलीस परवानगी घेण्यासाठी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा 'हे काय नवीन तुमचं' अशा शब्दात अधिकाऱ्यांनी आम्हाला खूप सुनावलं. "कॉलेज मध्ये जाऊन प्रबोधन करा. रस्त्यावर उतरून काय होणार. वगैरे...वगैरे..." पण, आम्ही मोर्चा काढण्यावर ठाम होतो. अखेर काही अटींवर आम्हाला परवानगी मिळाली होती.

22 जानेवारी 2015 रोजी शे सव्वाशे तरुण तरुणींना घेऊन फर्ग्युसन रोडवर Right To Love या बॅनरखाली आम्ही निषेध मोर्चा काढला. हातात लाल रंगाचे बदामाचे फुगे, बॅनर, भारतीय संविधानातील अधिकारांना अधोरेखित करून, घोषणा देत हा मोर्चा निघाला. अनेक प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी या मोर्चाची दखल घेतली. दरम्यान यापुढे दरवर्षी व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा करणार असं माध्यमांना ठामपणे सांगितलं. त्यानुसार साजरा केलाही. पण, अनेकांनी प्रश्न उपस्थित केला 'मोर्चा नंतर पुढे काय..? पुढे.........! प्रेम या विषयावरचं काम करायचं ठरवलं...आणि कामाला लागलो.
Right to love नावाचं फेसबुक पेजवर आम्ही आंतरजातीय, आंतरधर्मीय प्रेम विवाह, समलैंगिक विवाह, आपले हक्क अधिकारांबद्दल जागृती करू लागलो. दरम्यान अशा प्रकारच्या शंका आणि मदतीसाठी फोन येऊ लागले. सुरवातीला काही केसेस सोल्व्ह झाल्यानंतर आम्हाला विश्वास वाटला की आपण हे काम करू शकतो. नंतर या कामासाठी लोक जोडत गेलो. आता या ग्रुपमध्ये पत्रकार, वकील, समुपदेशक, वेगवेगळ्या चळवळीमधील परिवर्तनवादी विचारांचे तरुण तरुणी काम करतात.

आता कामाचा व्याप वाढलाय. सुरुवातीला महिन्यातून एक दोन केस यायच्या आता आठवड्याला 2-3 तरी केस येतात. गेल्या काही दिवसात फोन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या ग्रुपमधील सगळे कार्यकर्ते जॉब करून जमेल तशी ही जबाबदारी सांभाळतात. आता आम्हाला चांगल्या कार्यकर्त्यांचीदेखील गरज आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभरातून फोन येतात. महाराष्ट्राबाहेरील आग्र्यासारख्या शहरातील केस देखील सोल्व्ह करून त्यांचा आम्ही विवाह लावला आहे. या पाच  वर्षात 40 आंतरजातीय 4 आंतरधर्मीय प्रेम विवाह आम्ही लावून दिले आहेत. त्यांचे सहजीवन आता व्यवस्थित सुरू आहे. तीन बालविवाह थांबवण्याच काम देखील आमच्या हातून झालंय..याबरोबरच अनेक कपलचे काऊन्सलिंगदेखील आम्ही केले आहे. राईट टू लव्ह च्या कामाचे जाळे महाराष्ट्रातच काय संपूर्ण देशात पसरवायचे आहे

अर्थात लिहिलंय तितकं हा प्रवास सोपा नाही. या प्रवासात अनेक खाचखळगे आले आहेत. 
अगदी जीवावर बेतण्या इतपत.. आमच्याकडे एखाद्या सिनेमाच्या कथानकाला लाजवेल अशा प्रकारच्या केसेस येतायत त्यामुळे प्रत्येक वेळी बारकाईने अभ्यास करून निर्णय द्यावे लागतात.

पाच वर्षांच्या दरम्यान काम करत असताना चांगले वाईट आणि आपल्या जीवाला धोका निर्माण होतो की काय असे अनुभव आले. 
आमच्याकडे आलेल्या केसेस हाताळताना सगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो. रात्री अपरात्री कपलसाठी वेळ काढावा लागतो. अशा प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप सुद्धा असतो. आणि त्यात कपल आंतरधर्मीय असेल तर खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. अशाच एका केसमध्ये राजकीय पुढारी पोलीस स्टेशनला ठाण मांडून बसले होते. लग्न झालेल्या कपलला समजावून सांगत होते आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर सामाजिक तेढ निर्माण होतो की काय असं वातावरण तापलेलं. अशा परिस्थिती पोलिसांना कपल आणि आमच्या कार्यकर्त्यांना तिथून सहीसलामत बाहेर काढावा लागते. त्यामुळे पोलिसांचं सहकार्यदेखील आमच्यासाठी महत्वाचं आहे.

काही केसेसमध्ये कपलला संरक्षण देणे, त्यांची राहण्या खाण्याची सोय करणे, त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्नदेखील आम्हाला करावे लागले आहेत. अशा केसेसमध्ये त्यांच्या आणि कार्यकर्त्यानादेखील काळजी घ्यावी लागते. 

आता पुढच्या वाटचालीत अशा जोडप्यांसाठी कायदा बदलावा यासाठी प्रयत्न सुरु आहे. तसंच महापालिकांकडून कपल गार्डन उभारले जावे यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. 

फक्त प्रेम करणारे कपल नाही तर आमच्याकडे प्रेम विवाह झालेल्या जोडप्यांचे आणि इतर कौटुंबिक वाददेखील यायला लागले आहेत.

■ राईट टू लव्हची कामे:
1. प्रेमी युगलांना समुपदेशन देणे. 
2. जात, धर्म, लिंग विरहित प्रेमाला प्रोत्साहन देणे.
3. आंतरजातीय, आंतरधर्मीय तसेच प्रेमाविवाहाला प्रोत्साहन देणे.  त्यांना सर्वोत्तपरी मदत करणे.
4. प्रेमातून होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे.
5. बालविवाहांना विरोध करणे. बालविवाह रोखणे.
6. प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संविधानिक व कायदेशीर मार्गाने मदत करणे. 

■ राईट टू लव्हचे पुढील कार्यक्रम - 
1. प्रेम करणं ते व्यक्त करणं हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. प्रेम करणाऱ्या जोडप्यांना त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी व एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी रस्त्याच्या कडेला, नदीपात्रात किंवा ब्रीजवर बसावे लागते. अनेकवेळा पोलिसांकडून किंवा संस्कृती रक्षकांकडून त्यांना हुसकावून लावण्यात येते. पुण्यातील याच परिस्थितीचा अभ्यास करुन पुणे मनपाकडे आम्ही 'कपल गार्डनची; मागणी करणार आहोत. यामुळे प्रेम करणाऱ्या जोडप्यांना त्यांचा हा अधिकार सन्मानाने व प्रतिष्ठेने उपभोगता येईल. 

■ महिला, मुली यांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार एकतर्फी प्रेमातून होतात आणि प्रेम हा शब्द बदनाम होतो. त्यामुळे लैंगिक अत्याचार झालेल्या व्यक्तीला (महिला, मुली,  बालके) न्यायालयीन लढ्यामध्ये सर्वतोपरी 'मोफत कायदेशीरमदत' करणे.

■ आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांचे धोके पाहता त्यांच्या संरक्षणासाठी विशेष कायदा असणारी मागणीकेंद्र आणि राज्य सरकारकडे करणे तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणे. 

दर शनिवारी ग्रुपची बैठक- सर्व सदस्य दर शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे भेटतात.
या बैठकीत आलेल्या केसेसचा आढावा घेणे. पुढील कार्यक्रमाची आखणी करणे. केस स्टडीज करणे. इत्यादीवर सखोल चर्चा करण्यात येते

१४ फेब्रुवारीला प्रेमाचा दिवस साजरा - राईट टू लव्ह या संघटनेच्या वतीने दर वर्षी प्रेमाचा दिवस थाटामाटात साजरा करण्यात येतो. यावेळी पुण्यातील गजबजलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर किंवा जे एम रोडवर हातात लाल रंगाचे फुगे घेऊन, भारतीय राज्यघटनेतील अधिकारांना अधोरेखित करून, घोषणा देत तरुण तरुणी हा दिवस साजरा करतात.

Web Title: Right to Love story of a pune group which works for right of couples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.