लोणावळा : शहर परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वार्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे ओळकाईवाडी व रायवुड परिसरामध्ये अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मडून पडल्याने कुरवंडे फिडरचा वीजपुरवठा २४ तास खंडित झाला होता. कुरवंडे फिडरवरून वीजपुरवठा केला जाणार्या कुसगा भागापर्यंत तसेच रायवुड परिसरामध्ये एकूण ११ विजेचे खांब, तर सुमारे १०० झाडे विविध ठिकाणी कोलमडून पडली. यामध्ये अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या. यामुळे काल सायंकाळपासून २४ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. मागील पंधरवड्यात अशाच प्रकारे झालेल्या वादळी पावसामध्ये कार्ला परिसरामध्ये ४० गावांचा वीजपुरवठा २४ तासांहून अधिक खंडीत झाला होता. वारंवार विविध ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित होऊ लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सध्या उकाडा वाढला असून, रात्रभर वीज नसल्याने नागरिकांचे हाल झाले. तर वीजअभावी मोबाईल संच, इर्न्व्हटरच्या बॅटर्या चार्च झाल्या नाहीत. विद्युत उपकरणे बंद पडल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला होता. मॉन्सून सुरु होण्यासाठी अद्याप १५ दिवस शिल्लक असल्याने महावितरण कंपनीने याबाबत खबरदारीची उपाययोजना करून पावसाळ्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही, या काळजी घ्यावी. आपत्कालीन उपाययोजना सुरू ठेवावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. (वार्ताहर)
पाऊस फुल्ल; वीज झाली गूल
By admin | Updated: May 29, 2014 05:07 IST