दौंड : शहरासह परिसरात विजेच्या कडकडाटासह दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. दरम्यान परतीच्या पावसाने नागरिक सुखावले असून, पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ संपुष्टात आला असल्याचे चित्र आहे. सकाळी कडक उन्ह होते, तर दुपारी दीडच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण झाले. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर ठिकठिकाणी रस्त्यावर पाण्याचे डबके साचलेले होते. नेहमीप्रमाणे रेल्वे कुरकुंभ मोरीत पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. सुमारे अर्ध्या तासानंतर कुरकुंभ मोरीतील वाहतुकीची कोंडी सुटली. रस्त्याच्या कडेला पाणी साचलेले होते. तर गजानन महाराज मंदिर परिसरातील काही हॉटेलमध्ये पाणी गेले होते. गेल्या आठवड्यापासून पावसाच्या हलक्या सरी तर काही प्रमाणात जोराचा पाऊस होत आहे. त्यामुळे झालेल्या पावसाचे पाणी जमिनीत खोलवर गेल्याने जमिनीतील पाणीपातळी वाढत चाललेली आहे. झालेला पाऊस हा शेतीसाठी समाधानकारक असला तरी काही प्रमाणात नुकसानकारक आहे. (वार्ताहर)
विजेच्या कडकडाटासह पावसाने दौंडला झोडपले
By admin | Updated: September 27, 2016 04:20 IST