पुणे : शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. कीड व रोगविरहित रोपे मिळत नसल्याने उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे. हे लक्षात घेऊनच देशभरात नऊ स्वच्छ रोप निर्मिती केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यातील तीन केंद्रांची निर्मिती महाराष्ट्रात करण्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.पुण्यात द्राक्ष, नागपुरात संत्रा आणि सोलापुरात डाळिंब पिकांच्या रोपांची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून ३०० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले. पुण्यात आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅॅकेथॉन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या हॅकेथॉन स्पर्धेतील स्टार्टअप अर्थात नवउद्यम संशोधनपुरती मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. ते संशोधन व्यावसायिकदृष्ट्या बाजारामध्ये आणण्यासाठी पुण्यातील कृषी महाविद्यालयात संशोधन केंद्र अर्थात इनक्युबेशन सेंटर उभारावे, अशी सूचना कृषी मंत्री व कृषी आयुक्तांना केली आहे. याचे व्यावसायिक स्वरूपात रूपांतर करण्यासाठी राज्य सरकारचा स्टार्टअपसाठीचा १२० कोटी रुपयांचा फंड ऑफ फंड आणि त्या जोडीला केंद्र सरकारचा निधी एकत्रित करून त्याचा शेतकऱ्यांना फायदा करून देण्यात येईल. अशा स्वरूपाचे संशोधन मोठ्या शहरांपर्यंत मर्यादित न राहता राज्यातील दुसऱ्या, तिसऱ्या स्तरावरच्या शहरांमध्येदेखील पोहोचणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या मदतीने पीक संरक्षण योजना राज्यात आणण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री यांची चर्चा करू.”
पुण्यासह तीन ठिकाणी स्वच्छ रोप निर्मिती केंद्र, केंद्र सरकारचा पुढाकार, ३०० कोटींचा निधी देणार
By नितीन चौधरी | Updated: June 3, 2025 17:57 IST