डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढल्याने नगदी पिकांसाठी पोषण वातावरण तयार होत होते. पिके चांगली वाढून खरीप हंगामाची नुकसान भरपाई वसूल होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, मागील काही दिवसांपासून येथील वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून, त्यात रब्बीच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. परिणामी वेगवेगळ्या संकटांतून सावरताना शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने गहू, ज्वारी, हरभरा, मका पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मागील काही दिवसांपासून, वातावरणात बदल होत आहेत. त्यामुळे, विविध प्रकारच्या किडींसाठी ढगाळ वातावरण पोषक ठरत असल्याने, शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. अनेक शेतक-यांच्या शेतामधील गव्हाची उंचीच वाढली नाही त्यात खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तसेच,ज्वारीला चिकटा,हरबऱ्याला घाटे आळी व मकेला लष्कर आळी तसेच तांबेरा, मवा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे वाल्हे येथील शेतकरी कैलास पांडूरंग भुजबळ,गणेश जगन्नाथ भुजबळ यांनी सांगितले.