लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असून, राज्यातील ८० टक्के शाळा सुरू झाल्या असून, शाळांमधली विद्यार्थी उपस्थिती ३०.४४ टक्केच आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील १ हजार ८३० शाळांपैकी १ हजार २५२ शाळा सुरू झाल्या आहेत. शिक्षकांच्या कोरोना चाचणीचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश शाळा सुरू होणार आहेत.
कोरोनामुळे बंद झालेल्या पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारी रोजी सुरू करण्यास शिक्षण विभागाने मान्यता दिली. मात्र कोरोना चाचणी केल्याशिवाय शाळा सुरू करू नयेत, असे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार राज्यातील ९७ हजार २२३ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ४९३ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. तर २१ हजार २१३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी १६१ कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १ हजार ४४५ शाळा सुरू झाल्या.
शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यात पाचवी ते आठवीच्या ३३ हजार ३८७ शाळांमध्ये एकूण ३२ लाख ४५ हजार ५१२ विद्यार्थी आहेत. त्यातील ९ लाख ८७ हजार ७८८ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. गडचिरोली, अमरावती, गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्यांत विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय असल्याचे दिसून आले.
--------------------------------------
जिल्हानिहाय विद्यार्थी उपस्थिती (टक्केवारीत)
अहमदनगर -२८.९३ , अकोला - ३३.४०, अमरावती-४३.४३, औरंगाबाद -२५.३४ , भंडारा-४३.८५ , चंद्रपूर -४७.८१ ,धुळे -२७.००, गडचिरोली -६५.५३, गोंदिया -५२.८५, जालना-३०.१५ , नागपूर-८.९७, नांदेड -३२.९४,नाशिक -४३.२४, पालघर-२४.०१ ,पुणे-२६.१५, सातारा-४९.९०, सिंधुदुर्ग -४०.०३, ठाणे -९.४६, वर्धा-३९.९८, वाशीम -२३.०६, यवतमाळ -३६.२६,