राजगुरुनगर : लग्नात मानपान व्यवस्थित केला नाही आणि माहेरहून २ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ केल्याची घटना येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी पती, सासू, दीर, आणि जाऊ या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांडोली (ता. खेड) येथील मुलीचा २०११ साली भोसरी येथील संतोष वसंत गायकवाड याच्याबरोबर विवाह झाला होता. मात्र, सासरच्या लोकांचा लग्नात व्यवस्थित मानपान केला नाही, लग्नात जेवण नीट केले नाही आणि चांगला हॉल घेतला नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत होते. तिला आई वडिलांनी लग्नात ७ तोळे दागिने दिले होते. मार्च २०१२ मध्ये सासूने ते दागिने काढून घेतले आणि तिला माहेरी सोडून दिले. त्यानंतर काही दिवसांनी ती सासरी गेली असता, तुला नांदायचे असल्यास माहेरून २ लाख रुपये घेऊन ये असे सांगितले आणि धक्काबुक्की, शिवीगाळ, दमदाटी केली. सासरच्या या जाचाला कंटाळून विवाहितेने पोलिसात फिर्याद दिली. म्हणून सासरच्यांनी शारीरिक, मानसिक त्रास दिला आणि जाचहाट केला अशी फिर्याद फिर्यादीने दिली आहे. यावरून पोलिसांनी सासू पद्मा, नवरा संतोष, दीर उमेश, जाऊ रोहिणी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: January 19, 2015 00:04 IST