पिंपरी : फोर्स मोटर्सच्या कामगारप्रश्नी तोडगा काढण्यासाठी बोलावूनसुद्धा कंपनी व्यवस्थापनाचे कोणीही चर्चेसाठी आले नाही. चर्चेतून तोडगा निघू शकतो. कामगार कुटुंबीयांनी पाच दिवस उपोषण केले. आता उपोषण थांबवा, साखळी पद्धतीने आंदोलन सुरू ठेवा. कामगारांच्या न्याय, हक्काच्या लढ्यात सरकार तुमच्याबरोबर आहे. शासनाचा प्रतिनिधी म्हणून अशी ग्वाही देतो, असे स्पष्ट करून शासनाकडून जे कृतिशील पाऊल उचलायचे ते उचलले आहे, असे कामगार राज्यमंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितले.चिंचवड, काळभोरनगर येथे आंदोलनस्थळी कामगार राज्यमंत्री मेहता यांनी गुरुवारी भेट दिली. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘गेल्या वीस वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना तुटपुंजे वेतन दिले जात आहे. २००१ पासून वेतनवाढीचा करार होत नाही. कंपनीत दोन संघटना आहेत, त्यात मान्यताप्राप्त संघटना कोणती? असा वाद निर्माण झाला आहे. त्याचा गैरफायदा व्यवस्थापनाकडून उठविला जात असून, त्यात कामगार भरडला जात आहे. तोडगा काढायचा असेल, तर आमची कधीही चर्चेची तयारी आहे. त्यासाठी सरकार कामगारांच्याबरोबर आहे. ’’ भारतीय कामगार सेनेचे नेते सूर्यकांत महाडिक यांच्याशीदेखील चर्चा करणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी राज्यसभेचे उमेदवार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, भाजपाचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, एकनाथ पवार, नामदेव ढाके, उमा खापरे, राजू दुर्गे, राजेश पिल्ले, नगरसेवक दत्ता साने, जगदीश शेट्टी, मंगला कदम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सरकार आंदोलनकर्त्यांबरोबर
By admin | Updated: March 13, 2015 06:27 IST