मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या ठिकाणी राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी भेट देऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या कुटुंबीयांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे, असेही महाजन म्हणाले.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उप विभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार , गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
लोकांनी काळजी घ्यायला हवी!आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "घटनेची माहिती मिळताच मी नाशिकहून गाडी वळवून येथे पोहोचलो आहे. घटनास्थळी एनडीआरएफ पथक, आपदा मित्र, पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएचे अग्निशमन दल व स्थानिक मदत बचाव संस्था आदी घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. नागरिकांना वाचविण्यासाठी स्थानिकांनी मोठ्याप्रमाणात मदत केली आहे. घडलेल्या घटनेची चौकशी केली जाईल. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटनेबाबत शासन सतर्क असून यापुढे पर्यटकांनी खबरदारी घेतली पाहिजे. पूल धोकादायक होता. तरीही त्यावरून लोक जात होते. याप्रकरणाबाबत चौकशी करण्यात येणार आहे."