शेलपिंपळगाव : पुणे जिल्ह्यातील भीमा, भामा, इंद्रायणी तसेच अन्य बहुतांशी सर्वच जीवनवाहिन्यांना जलपर्णींचा फास बसलेला आहे. प्रदूषणाच्या जोडीला जलपर्णींच्या संकटाने अतिक्रमण केल्यामुळे हिवाळा संपता संपता नद्यांचा ताबा घेत असून पावसाळ्यापर्यंत त्यांचे साम्राज्य नद्यांवर राहते. परिणामी जीवनवाहिन्यांचा श्वास कोंडला जाऊन जलप्रदूषण फोफावत चालले आहे.जलपर्णींमुळे पाण्यावर सूर्यप्रकाश पडण्यात अडथळा निर्माण होत असल्याने पाण्यातील इतर जीवांसाठी धोकादायक ठरत आहे. कारखान्यांमधील रसायनमिश्रीत पाणी, गटारांमधील अस्वच्छ पाणी तसेच दररोजच्या वापरातील पाणी अवैधरित्या नद्यांमध्ये सोडले जात असल्याने नद्यांमधील पाण्याचे अगोदरच मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. प्रशासनाने नद्यांमधील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आता अत्यंत गरजेचे बनले आहे. ग्रामीण भागात नद्यांमधील पाण्याचा वर्षभर शेती सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी उपयोग केला जातो.कारखान्यांमधील रसायनमिश्रीत, मलमूत्र अशुद्ध पाणी बेकायदेशीररित्या नद्यांच्या प्रवाहात सोडले जात असल्याने पाण्याच्या पृष्ठभागावर जलपर्णींचा विळखा पसरण्यास सुरुवात होते. दुर्गंधीमुळे त्रस्तनदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात साठून राहिल्यामुळे केवळ डासांचीच निर्मिती होत नसून, एकाच जागी साठलेले दूषित पाणी व त्यातील जलपर्णींमुळे दुर्गंधी पसरली जात आहे. उग्र अशा दुर्गंधीमुळे नदीशेजारील रहिवाशांना घरात बसणेही मुश्कील होत आहे. डास आणि दुर्गंधी अशा दुहेरी त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या समस्येकडे आरोग्य विभागाचे अनेक वेळा लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष होते.
जिल्ह्यातील नद्यांना फास जलपर्णींचा
By admin | Updated: February 5, 2017 03:21 IST