भोर : तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे भोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणातील पाणी गढूळ झाले असून, फिल्टर नादुरुस्त असल्याने संपूर्ण भोर शहराला दोन दिवसांपासून ते प्यावे लागत आहे. पावसाळयापूर्वी भोर नगरपलिकेने फिल्टरची दुरुस्ती केली नाही, तर भोरवासीयांना चिखल व गाळमिश्रित अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.भोर नगरपलिकेचा मागील दोन वर्षांपूर्वी केलेला पाणी शुद्ध करण्याचा नवीन (फिल्टर प्लांट) सुरू आहे. मात्र, जुन्या फिल्टरला वाळू नाही. पाईप खराब झाले असून ब्लीचिंग पावडरचा अभाव, घाण, कचरा यांमुळे फिल्टर जाम झाला असल्याने तो बंद आहे. त्यामुळे २५ टक्के शहराला फिल्टरने शुद्ध केलेल्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, सदर फिल्टरचे पाणी शहराला फिरवल्याने एका फिल्टरने पाणी शुद्ध होत नसल्यामुळे संपूर्ण भोर शहराला गाळमिश्रित गढूळ पाणी येत आहे. याशिवाय, शहरातील शंकर हिल येथे नवीन १५ लाख लिटरची, एक ७ लाख लिटरची, २ चार लाख लिटरच्या जमिनीवरच्या तर पेशवाई हॉटेलजवळ एक लाख व स्वामी समर्थ मंदिराजवळ ४ लाख लिटरच्या उंचावरच्या अशा एकूण २५ लाख लिटर पाणी साठविण्यासाठी टाक्या आहेत. २०१२मध्ये झालेल्या नवन्ीा फिल्टरवरून शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. भोर शहराला दररोज सुमारे २५ लाख लिटर पाण्याची गरज आहे. मात्र, एक फिल्टर नादुरुस्त असल्याने एकाच फिल्टरवरून ८ ते १० लाख लिटरच शुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने २५ टक्केच शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो, तर ७५ टक्के शहराला अशुद्ध पाणीच प्यावे लागत असल्याचे चित्र आहे.
भोरवासीयांना चिखल व गाळमिश्रित अशुद्ध पाणी
By admin | Updated: June 24, 2015 05:10 IST