पुणे : देशात ई-वेस्टच्या कचरा निर्मितीमध्ये सातव्या व राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे शहराला ई-वेस्टचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. ई-वेस्ट संकलित करण्यासाठी असलेली अपुरी यंत्रणा आणि या वेस्टमधील पुन्हा वापरता येणारे घटक वेगळे न करता त्याचे केले जाणारे डिसमेटलिंग (तोडफोड) यामुळे पर्यावरणाबरोबरच कचऱ्यात काम करणाऱ्या शेकडो कचरावेचकांनाही धोका निर्माण झाला आहे. गेल्या दशकभरात शहराची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, विद्येचे माहेरघर असलेले पुणे आयटी सिटी म्हणून नावारूपास आले आहे. हिंजवडी, खराडी तसेच मगरपट्टा सिटी परिसरात आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. याशिवाय, दैनंदिन जीवनातही इलेक्ट्रॉनिक वस्तंूचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने तसेच चिनी बनावटीच्या इलेक्ट्रिक वस्तंूची भरमार असल्याने शहरात ई-वेस्टची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महापालिकेने शहरातील संस्थांकडून मागील वर्षी ई-वेस्टबाबत केलेल्या सर्वेक्षणात शहरात दर वर्षी तब्बल ८ ते ९ हजार टन ई-वेस्टची निर्मिती होत असल्याचे समोर आले आहे. तर पुणे हे मुंबईपाठोपाठ ई-कचऱ्याची निर्मिती होणारे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून पुढे आले आहे.(प्रतिनिधी)संकलन आणि जनजागृतीचा अभाव ई-वेस्टच्या कचऱ्याची समस्या गंभीर बनत असल्याने त्याचे संकलन करून त्याचा मोठ्या प्रमाणात पुनर्वापर तसेच वापरता न येणाऱ्या घटकांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. मात्र, या कचऱ्याचे संकलन आणि त्याची विल्हेवाट लावण्याबाबत जनजागृती नसल्याने दर वर्षी निर्माण होणाऱ्या ८ ते ९ हजार ई-वेस्टमधील अवघे ३ ते ४ टन ई वेस्टच गेल्या वर्षभरात महापालिकेस संकलित करण्यात आला आहे. त्यासाठी पालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांच्या धर्तीवर वुई कलेक्ट मोहीमही राबविण्यात आली. मात्र, तिला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे यावरून दिसून येते. सध्या पालिकेचे कोथरूड येथे एक कलेक्शन सेंटर असून हडपसर येथे दुसरे संकलन केंद्र सुरू होणार आहे.संकलन केंद्रे आणि जनजागृती वाढविणार गेल्या दशकभरात शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याबरोबरच ई-वेस्टचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे या कचऱ्याबाबत जनजागृती आणि तो संकलित करण्यासाठी एक संकलन केंद्र सुरू आहे. मात्र, नागरिकांना त्या वस्तूंंच्या मोबदल्यात पैसे हवे असल्याने तो जमा न करता तो भंगार व्यावसायिकांकडे विकण्यावर भर देतात. मात्र, तो खरेदी करणाऱ्यांकडून कचरा रिसायकलसाठी न पाठवता, त्याचे डिसमेटलिंग केले जाते. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे हा डिसमेटल केलेला कचरा कोठे जातो, याबाबत काहीच निष्कर्ष लावणे शक्य नाही. त्यामुळे या कचऱ्याबाबत जनजागृती करून लवकरच संपूर्ण शहरात संकलन केंद्रे सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख सुरेश जगताप यांनी लोकमतला सांगितले.