धरणग्रस्तांचा एल्गार, धरणग्रस्तांचे तहसील कचेरीवर एल्गार आंदोलन
मुळशी : मुळशी धरण विभाग विकास मंडळ यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एल्गार आंदोलन करण्यात आले. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली १०० वर्षांपूर्वी सत्याग्रह झाला होता. त्या सत्याग्रहाला शतक पूर्ण होत असताना मुळशी धरणग्रस्तांच्या मूलभूत गरजा आजही पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी एल्गार आंदोलन केले.
त्यामध्ये हक्काचे घर, वीज, पाणी, रस्ते, वैद्यकीय सुविधा, शिक्षण, नोकऱ्या, एसटी थांबे, धरण जलाशयाच्या जवळील जमिनी ज्या शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिल्या होत्या, त्या पुन्हा कसण्यासाठी मिळाव्यात व त्या जमिनीवर फळबाग लागवडीस परवानगी मिळावी. सामाजिक बांधिलकीतून मिळणारा निधी सी.एस.आर. फंड फक्त धरण विभागातच खर्च करावा, जे आदिवासी बांधव जलाशयाजवळ राहतात, त्यांना घरकुलासाठी जमीन मिळावी, धरण विभागातील नागरिकांची वाहतूक करणाऱ्या कामगारांना जिल्हा परिषदेने व टाटा कंपनीने कायम नोकरी द्यावी व त्याचा पगार टाटा कंपनीने द्यावा, टाटा कंपनीने जलाशयाच्या बाजूला भिंत बांधते त्या ठिकाणी जलाशयावर जनावरांना पाणी पिण्यासाठी जायला रस्ते ठेवावे, टाटा कंपनी त्याची जमीन मोजत असून सदर जमिनीवर गावठाणसाठी जागा मिळावी व पुलाचे काम होईपर्यत मोजणी थांबवावी, जामगाव येथे टाटांच्या जागेत क्रीडांगणास जागा मिळावी, शेडणी फाटा येथे शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा मिळावी, ठरल्याप्रमाणे प्रत्येक गावात शिक्षक निवास बांधून मिळावे, जुन्या शाळा दुरुस्त करणे, मोडकळीस आलेल्या शाळांची पुनर्बांधणी करावी, टाटा कंपनीत शिक्षणानुसार सुशिक्षितांना नोकऱ्या मिळाव्यात, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार अभय चव्हाण यांना देण्यात आले.
यावेळी रवींद्र (बाबा) कंधारे, धरण विभाग विकास मंडळ अध्यक्ष गणपत वाशिवले, हनुमंत सुर्वे, अंकुश मोरे, एकनाथ दिघे, अनिल अधवडे, श्रीराम वायकर, चंद्रकांत जाधव, पांडुरंग निवेकर, गोविंद सरुसे, सचिन पळसकर, दत्ता दिघे, दशरथ गोळे, आबा दिघे, दत्ता गोरे, भरत गाउडसे, धुळा कोकरे, एकनाथ जांभूळकर, अर्जुन पठारे, जयराम दिघे, परमेश्वर जोरी, बाळू मराठे, किसन पडवळ, विठ्ठल पडवळ, विष्णू ढोरे, वसंत वाळज, संतोष कदम, स्वाती वाशिवले, आशा मेंगडे, विशाल पडवळ यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष मोहोळ, महिला आघाडी जिल्हा संघटिका संगीता पवळे, स्वाती ढमाले, महिला आघाडी तालुका संघटिका ज्योती चांदेरे, भा. वि .सेना जिल्हा संघटक राम गायकवाड, संतोष दगडे, तात्या देवकर, राणी शिंदे उपस्थित होते.
तहसीलदार अभय चव्हाण यांनी आंदोलकांना आंदोलन दिले की, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून धरणग्रस्तांच्या प्रश्न सोडविण्याचा सरकारदरबारी प्रयत्न करू व धरणभागात चाललेली मोजणी तूर्तास थांबवली आहे. त्यामुळे १०फेब्रुवारीपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात येईल.
-
सचिन पळसकर, आंदोलक