पिंपरी : वटपौर्णिमेला वडाच्या फांदीची पूजा न करता झाडाची पूजा करावी. अगदीच अशक्य असेल, तर प्रतीकात्मक स्वरूपात वडाच्या झाडाच्या चित्राची पूजा करावी, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाने केले आहे.भारतीय स्त्रीच्या जीवनात वटवृक्षाला विशेष महत्त्व आहे. चिरंतन सौभाग्यासाठी भारतीय स्त्रिया वडाची पूजा करतात. पुराणकाळात सावित्री वटवृक्षाचे माहात्म्य जाणत होती. म्हणूनच तिने मूर्च्छा आलेल्या सत्यवानाला वटवृक्षाखाली झोपवले. कारण ते झाड इतर झाडांच्या तुलनेत सगळ्यात जास्त म्हणजेच जवळजवळ साठ टक्के प्राणवायू हवेत सोडते. मृतवत पतीला प्राणवायूची सगळ्यात जास्त गरज होती, हे तिला माहिती होते. आधुनिक भाषेत वटवृक्ष नैसर्गिक व्हेण्टिलेटरचे काम करतो.भारतीय जीवनशैलीत सजीव सृष्टीतील प्रत्येक भागीदाराचा जितका समतोल राखला जात असे, तितका जगात अन्यत्र कोठेही सांभाळला गेला नसेल. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा उदात्त वारसा असलेल्या देशात आधुनिक काळात सण-उत्सवांना हिडीस स्वरूप येत गेले आहे. वटपौर्णिमा हा मंगल संस्कार न राहता यांत्रिक सोपस्कार झाला आहे.हा सण भारतीय स्त्रियासाठी जरी जिव्हाळ्याचा असला, तरी पर्यावरणप्रेमींसाठी मात्र तो मन विषण्ण करणारा अनुभव असतो. पर्यावरणप्रेमींना पौर्णिमेनंतर रस्त्यावर पडलेल्या, पायदळी तुडवल्या जाणाऱ्या वटवृक्षाच्या पूजनीय फांद्या व त्यांचे मातीमोल झालेले रूप पाहावे लागते, असे सचिव भास्कर रिकामे यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
‘वडाच्या फांद्यांची पूजा नको’
By admin | Updated: June 9, 2014 05:22 IST