भिगवण : वाळू व्यवसायातील वादातून झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या तरुणावर पुणे शहरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. भिगवण येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या गोळीबाराची घटना घडली होती. हल्लेखोर पुणे शहरातील आहेत. संशयित तिघा हल्लेखोरांना याप्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाल करीत गोळीबार झालेल्या दिवशीच रात्री साडेअकरा वाजता तिघा जणांना अटक केली आहे.या घटनेतील गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या विनोद गुणवंत बंडगर (वय ३०) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महेंद्र नानासाहेब जगताप याच्यावर पुणे येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहेत. राहू (ता. दौंड) येथील गोळीबाराची घटना ताजी असताना भिगवण येथे हा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या तणावामुळे भिगवण पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पावले उचलल्याने स्थिती नियंत्रणात आहे. अद्यापदेखील परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. वाळू व्यावसायिक आणि वाहतूकदार यांच्यातील पावती रकमेवरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान गोळीबारात झाले. त्यातून एका तरुणाला हकनाक आपला जीव गमवावा लागला. याबाबतची फिर्याद गुणवंत शंकर बंडगर यांनी दिली आहे.गोळीबारप्रकरणी आरोपी पृथ्वीराज ऊर्फ चिक्या संजय तनपुरे, मनीष विजय तनपुरे (दोघेही वय २१, रा. सर्व जण बालाजीनगर, पुणे ४३), शरद बबन चौरे (वय ३२, रा. आंबेगाव, पुणे) या तिघांना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी संजय तनपुरे साथीदारांसह फरारी आहे. दरम्यान, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विनोद बंडगर याच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)
भिगवण गोळीबार प्रकरणातील एकाचा मृत्यू
By admin | Updated: September 29, 2015 02:20 IST