पुणे :पुणे महापालिकेवर सर्वाधिक काळ काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती. १९९० नंतर पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडींचा उदय झाला. कलमाडी यांनी सबसे बड़ा खिलाडी म्हणून पुण्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला. त्यानंतर कलमाडी यांच्या नेतृत्वाला सुरुंग लावण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अन् महापालिकेत शिवसेना आणि भाजपला बरोबर घेऊन पुणे पॅटर्नची निर्मिती केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने काही वर्षे पुणे पॅटर्न आणि काँग्रेससोबत आघाडी करून दहा वर्षे पुणे महापालिकेवर हुकूमत गाजवली. २०१७च्या महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. राजकीय स्थित्यंतरात उपमुख्यमंत्री अजित पवार, स्व. गिरीश बापट, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे नेते उदयास आले. पण, सुरेश कलमाडींनंतर केंद्रात आणि राज्यात दबदबा असलेल्या पुण्याचा चेहरा कोण? हा प्रश्न मात्र आजही कायम आहे.
साधारणपणे १९८४ ला पुण्यात काँग्रेसचा विरोधी पक्ष म्हणून भाजपचा उदय झाला. १९८४ आणि १९८९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विठ्ठलराव गाडगीळ यांनी भाजपचे अण्णा जोशी यांचा पराभव केला. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या अण्णा जोशी यांनी काँग्रेसच्या विठ्ठलराव गाडगीळ यांचा पराभव केला. भाजपचे पहिले खासदार होण्याचा बहुमान अण्णा जोशी यांना मिळाला. याच कालावधीत पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांचा उदय झाला. काँग्रेसच्या परंपरागत राजकारणाला धक्के देत पुण्यात कलमाडी पॅटर्न सुरू झाला. त्यातच १९९९ शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेसमधील ही फाटाफूट भाजपच्या पथ्यावर पडली आणि भाजपचे प्रदीप रावत १९९९ ला खासदार बनले.
पुणे काँग्रेसमधील नेतृत्वाची पोकळी हेरून सुरेश कलमाडी काँग्रेसमध्ये परतले. त्यानंतर २००४ आणि २००९ या लोकसभेच्या दोन्ही निवडणूक कलमाडी यांनी जिंकल्या. यावेळी केंद्रात युपीएच्या माध्यमातून काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. पुणे फेस्टिव्हल, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे फिल्म फेस्टिव्हल, कॉमनवेल्थ युथ गेम्स, असे अनेक उपक्रम कालमाडी यांनी सुरू केले. पुण्याचा चेहरा म्हणून सुरेश कलमाडी, अशी ओळख बनली.
पुणे महापालिकेच्या २००७निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांना एकत्र घेऊन पुणे पॅटर्न तयार केला. दादा विरुद्ध भाई या संघर्षात निर्माण झालेल्या पुणे पॅटर्नची राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर कलमाडींच्या राजकारणाला उतरती कळा लागली. दिल्लीतील कॉमनवेल्थ घोटाळ्यात कलमाडी यांना आरोपी केले. पुणे महापालिकेत २०१२ मध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती. अजित पवार हे राज्याचे नेतृत्व. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी स्वतःचा दबदबा निर्माण केलेला आहेच, पण अजित पवार यांना पुणे शहरामध्ये समर्थपणे साथ देणारे नेतृत्व लाभलेले नाही.
२०१७ च्या पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचा पराभव करत भाजपची एक हाती सत्ता आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोथरूड मतदारसंघात बाहेरून येऊन भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी झाले. २०१९ ला खासदार झाल्यापासून गिरीश बापटांचे नेतृत्व आकार घेऊ लागले होते. भाजपमध्येही चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट, अशी दोन सत्ता केंद्रे झाली. २०२३ साली गिरीश बापट यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ विजयी झाले. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडून दोन गट निर्माण झाले. राजकीय समीकरणे बदलली आहे.
इतिहास सांगतो... फुटीचा फायदा भाजपलाच१९९८ च्या लोकसभा निवडणुकीमुळे सुरेश कालमाडी यांच्या राजकारणाला काही काळ ब्रेक बसला. कलमाडी १९९८ ची निवडणूक काँग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष लढले आणि त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवार यांनी विठ्ठलराव तुपे यांच्याकडून कलमाडींचा पराभव घडवून आणला होता. काँग्रेसमधील ही फाटाफूट भाजपच्या पथ्यावर पडली आणि भाजपचे प्रदीप रावत १९९९ ला खासदार बनले. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार असे दोन स्वतंत्र गट झाले आहे. या फुटीचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपलाच होण्याची शक्यता आहे.
पुण्याचे राजकारण बदलत गेलेपुणे महापालिकेत ३४ गावांचा सामवेश झाला. त्याने पुणे महापालिका ही भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वात मोठी महापालिका झाली. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये पुण्याचा प्रचंड विस्तार झाला. देश-विदेशातून अनेक विद्यार्थी पुण्यात येतात. त्यातून पुण्याचा चेहरा-मोहरा बदलला तसेच राजकारणही बदलत गेले.