पिंपरी : शहरवासियांना विश्वासात घेतल्याशिवाय शहराचा विकास करता येणार नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेला चऱ्होलीतील नगरविकास योजनेचा (टीपी) आराखडा रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
पिंपरी-चिंचवडमधील चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे कलादालन व सभागृह, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीच्या समूहशिल्पाचे लोकार्पण, विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, श्रीकांत भारतीय, माजी आमदार अश्विनी जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नितीन काळजे, राहुल जाधव, आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, या संतपीठाला वैश्विक स्वरूप दिले असून येथे संपूर्ण संतसाहित्य सीबीएससी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी या चारही भाषांमधून शिकविले जाणार आहे. विविध वाद्ये वाजविण्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. संतपीठाने तयार केलेल्या संकल्प आराखड्यानुसार पंढरपूर व आळंदी येथे उभारण्यात येणाऱ्या संतपीठाला शासन मदत करेल. ते म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषेला वैश्विक भाषा, ज्ञानभाषा व अर्थकारणाची भाषा बनविण्याचे दालन खुले केले आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे.
संतपीठाचे संचालक डॉ. मोरे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने संत परंपरा जपणारी शाळा स्थापन केली आहे. विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी संतपीठाचा मोलाचा सहभाग असेल.ये पब्लिक है, ये सब जानती है‘आम्ही काम करत आहोत. त्याचे श्रेय दुसरेच घेत आहेत’, अशी खंत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली होती. त्यावर फडणवीस म्हणाले की, महेश लांडगे खूप चिंता व्यक्त करत आहेत. श्रेय घेण्याबाबत मी सांगतो की, ये पब्लिक है, ये सब जानती है. आपण दुसऱ्याचे श्रेय घेऊ शकत नाही आणि आपले श्रेय दुसरा कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे फार चिंता करायची नाही. आपण काम करत राहायचे. जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे. ते आपण निवडणुकीत पाहिले.