पिंपरी : अधिकारी, विविध संस्था, ठेकेदार यांच्या समन्वयाने महापालिकेत मोठ्या स्वरूपात दुकानदारी सुरू आहे. याचा प्रत्यय स्थायी समितीत बिनबोभाट मंजूर होणाऱ्या प्रस्तावातून आला आहे. दुकानदारीत जनसंपर्क विभाग आघाडीवर असल्याचा प्रत्यय स्थायी समितीत नुकत्याच मंजूर झालेल्या एका प्रस्तावाने आला आहे. महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित असल्याने जनसंपर्क विभागच दुकानदारीचे केंद्र बनला असून, त्याकडे आयुक्त अथवा अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहूतून संत तुकाराममहाराज आणि आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरला जात असते. या १८ दिवसांच्या कालावधीत संतांचे अभंग दृकश्राव्य माध्यमातून सोशल मीडियावर पोहोचविण्यासाठी एका संस्थेचा पाच लाखांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. अवघ्या १८ दिवसांत ५ लाख रुपये लाटण्याचा हा प्रयत्न असून, स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवरील अक्षरी आकडा एक आणि अंकी वेगळीच रक्कम अशी खेळी करण्यात आली आहे. पालखी सोहळ्याला काहीच दिवस उरले असल्याने कोणाला विचार करण्याची संधी न देता बिनबोभाट विषय मंजूर करून घेण्यात आला आहे. ज्या संस्थेचा हा प्रस्ताव आहे, त्याच संस्थेकडून झाडांच्या बिया घेण्याची सुपीक कल्पना यापूर्वीच रेटून नेण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये जनसंपर्क विभागाचा पुढाकार आहे. आर्थिक विषयांना मंजुरी देणाऱ्या स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणाऱ्या प्रस्तावात खर्चाच्या आकड्यांमध्ये चूक होणे ही गंभीर बाब आहे. ही चूक अनवधानाने नाही कशी होईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बातम्यांचे अपडेट्स अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळावेत, यासाठी दरमहा विशिष्ट रक्कम मोजून महापालिकेने खासगी संस्थांची पॅकेज घेण्याचे उपद्व्याप केले आहेत. महापालिकेच्या विविध विभागांच्या बातम्या, घडामोडी जनतेपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी प्रसारमाध्यमांना वेळच्या वेळी माहिती देण्यात कमी पडणाऱ्या जनसंपर्क विभागाला दुकानदारीत रस असल्याचे निदर्शनास येत आहे. वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना महापालिकेच्या प्रकल्पांची माहिती घ्यायची असेल, तर जनसंपर्क विभागात तातडीने ती मिळत नाही. त्यासाठी संबंधित विभागप्रमुखांना संपर्क साधणे भाग पडते. वर्षानुवर्षे या विभागात सुधारणा घडवून आणण्याचे कोणी प्रयत्न केले नाहीत. (प्रतिनिधी)नागरिकांच्या माहितीसाठी जनजागृती अभियान राबवायचे म्हणून महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचे प्रयोग जनसंपर्क विभागामार्फत वारंवार राबवले जातात. राष्ट्रपुरुषांची जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम समाजासाठी संवेदनशील असल्याने कोणी काही बोलत नाही. परंतु, याचा फायदा उठविण्यात जनसंपर्क विभागाने बाजी मारली आहे. अशा कार्यक्रमांसाठी स्वतंत्र समिती नेमावी, हे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. थकीत कर भरण्यासाठी वृत्तपत्रांकडे बातमी पाठवण्यापेक्षा ध्वनिक्षेपक लावलेल्या रिक्षा फिरवून लाखो रुपये खर्च करण्यास अधिकारी प्राधान्य देतात. स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवरील प्रस्ताव पाहिल्यानंतर ठेकेदार, खासगी संस्थांचे प्रतिनिधी यांचे अधिकाऱ्यांशी किती साटेलाटे आहे, हे निदर्शनास येते. कोणताही प्रस्ताव, खर्च कितीही असो, महापालिका तो मंजूर करेल, अशा तत्त्वावर महापालिकेचा कारभार सुरू आहे.
महापालिका बनली ठेकेदारांसाठी ग्राहक पेठ
By admin | Updated: June 19, 2016 04:40 IST