मानवत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत निष्काळजीपणा करणाऱ्या व्यापाऱ्यांना तहसीलदार डी. डी. फुपाटे आणि पालिकेचे मुख्याधिकारी जयंत सोनवणे यांनी २४ फेब्रुवारी रोजी नगरपरिषद ते पोलीस ठाण्यापर्यंत फेरी काढून नियम व अटींचे पालन करण्याची तंबी दिली.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मास्क वापरण्यासह इतर नियम व अटी पाळण्यासाठी मागील तीन दिवसांपासून प्रशासन सक्ती करीत आहे. मागील तीन दिवसांत १ हजार १०५ जणांकडून ११ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. हा दंड वसूल करताना सर्वसामान्य नागरिकांनी तहसीलदार डी. डी. फुफाटे आणि पालिकेचे मुख्याधिकारी जयंत सोनवणे यांच्यासमोरच बाजारपेठेतील दुकानदार नियम व अटींचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे आमच्यासह त्यांनाही दंड आकारा अशा सूचना नागरिकांनी केल्या. त्यानंतर तहसीलदार डी. डी. फुफाटे आणि मुख्याधिकारी जयंत सोनवणे यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर नगरपरिषद ते पोलीस ठाणे परिसर पर्यंत पथकासह फेरी काढली. त्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या व्यापाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, ग्राहकांत सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी व्यवस्था करण्याची तंबी दिली. या फेरी दरम्यान प्लास्टिक कॅरीबॅग वापरणाऱ्या व्यापाऱ्याला २ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश
या कारवाईत अभियंता सय्यद अनवर, अमोल तांदळे, ओम चव्हाण, सचिन पवार, शेषराव बोरेवाड, शाकिर अली, शतानिक जोशी, संतोष खरात, एकनाथ जाधव, दीपक भदर्गे, सुनील कीर्तने, दीपक सातभाई, अरुण वीर, आर. डी. झोडपे, सुभाष लांडगे, सचिन पवार, सय्यद मीर, पंकज पवार, सचिन सोनवणे, एस. एस. काळे, ए. एस. वाडकर, मनमोहन बारहाते, बळीराम दहे यांसह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.