गंगाखेड ते परभणी रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर दीड वर्षांपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. चौपदरी होत असलेल्या रस्त्याच्या कामासाठी जुना रस्ता पूर्णपणे खोदून काम केले जात असलेल्या रस्त्याचे काम ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. पूल असलेल्या ठिकाणी व अन्य काही ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण राहिले आहे. त्याचप्रमाणे खळी पाटीजवळून वाहत असलेल्या गोदावरी नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात झालेले खड्डे काही दिवसांपूर्वी सिमेंट काँक्रीटचे साहित्य टाकून बुजविण्यात आले. मात्र, या कामावर पाणी न टाकल्याने तसेच कच्च्या कामावरून वाहनांची रहदारी सुरू राहिल्याने सिमेंट काँक्रीट उखडून गोदावरी नदीपुलावरील खड्डे पुन्हा जैसे थे झाले आहेत. तसेच टाकलेल्या सिमेंट काँक्रीटचे साहित्य मातीसारखे झाल्याने येथून वाहने जाताच धूळच धूळ उडत असल्याने रस्त्यावरील खड्डयांबरोबर वाहनधारकांना आता धुळीचाही नाहक त्रास सोसावा लागत आहे. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे दुचाकींच्या अपघातातही मोठी वाढ झाली असून दरदिवशी दुचाकी वाहनांच्या किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. दुचाकी व अन्य वाहनचालकांचा त्रास कमी करण्यासाठी काम सुरू असलेल्या ठिकाणच्या रस्त्यावर किमान टँकरने पाणी शिंपडून धूळ शमवावी अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.
गोदावरी नदी पुलावरील खड्डे जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST