वसमत रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था
परभणी : शहरातील वसमत रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. या निवाऱ्यांच्या ठिकाणी थांबण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर थांबूनच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्याचप्रमाणे सावली विश्रामगृह परिसरातील प्रवासी निवाऱ्याची तर दुरवस्था झाली आहे. एसटी. महामंडळाने याकडे लक्ष देऊन प्रवासी निवारे प्रवाशांना सोयीचे ठरतील, या पद्धतीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
जि.प.च्या इमारतीचे काम संथगतीने
परभणी : शहरातील जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम संथगतीने होत असून, अनेक कार्यालयांचे स्थलांतर रखडले आहे. जिल्हा परिषदेची अनेक विभाग वेगवेगळ्या भागात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय होते. जि.प. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर हे सर्व कार्यालये एकाच छताखाली येऊन ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे. तेव्हा जि.प. इमारतीचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
जलवाहिनीला गळती; पाण्याचा अपव्यय
परभणी : शहरात जुन्या जलवाहिनीला गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. नळांना पाणी आल्यानंतर गळतीद्वारे हे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. त्याचा वाहतुकीलाही होतो. शिवाय गळतीद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. आगामी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेता, गळती दुरुस्त करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
पणन महासंघाने बंद केले खरेदी केंद्र
परभणी : जिल्ह्यात कापूस खरेदीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने कापूस पणन महासंघाने कापसाची खरेदी बंद केली आहे. परभणीसह पाथरी, गंगाखेड आणि सोनपेठ या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. आता तीन खरेदी केंद्र बंद करण्यात आले असून, केवळ परभणी येथील केंद्रावरच कापसाची खरेदी केली जात आहे/.
मग्रारोहयोतील विहिरींची कामे संथगतीने
परभणी : ग्रामीण भागातील संभाव्य पाणी टंचाई दूर करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक विहिरींचे बांधकाम केले जात आहे. मात्र अनेक तालुक्यात ही कामे ठप्प पडली आहेत. उन्हाळा तोंडावर आला असताना विहिरींची कामे पूर्ण झाली नसल्याने योजनेचा उद्देशालाच बगल मिळत आहे.