शहरात सकाळी ७ ते ११ या दरम्यान मुख्य बाजारपेठेसह विविध वसाहतीतील किराणा साहित्याची दुकाने, भाजीपाला व फळांची विक्री सुरू होती. यादरम्यान बाजारातील गांधी पार्क, कच्छी बाजार, जनता मार्केट, क्रांती चौक येथील भाजी मंडई व वसमत रोडवरील काळीकमान येथील भाजी मंडईत नागरिकांची दिसून आली. तसेच इतर व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी नसतानाही अनेक ठिकाणी व्यापारी आपल्या दुकानासमोर ठाण मांडून बसले होते तर दुकान बंद ठेवत मागच्या दाराने ग्राहकांना प्रवेश दिली जात होता. किराणा वगळता अन्य अनेक दुकाने सुरू ठेवली जात होती. शहरातील महापालिकेचे पथक आणि पोलिसांचे पथक मात्र दिवसभर नेमून दिलेल्या ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी आणि अन्य बंदोबस्त कामात अडकले होते. याचाच फायदा घेत नागरिक आणि व्यापारी छुप्या पद्धतीने विक्री सुरू ठेवत असल्याचे दिसून आले. सकाळी ११ नंतरही अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी दुपारी १ पर्यंत झाली होती.
फळ, भाजी विक्रीचे एकाच ठिकाणी हातगाडे
गव्हाने चौक येथे दुपारी १ वाजता ५ ते ६ हातगाडे एकाच ठिकाणी थांबून भाजी, फळ यांची विक्री करत असल्याचे दिसून आले. तसेच काळी कमान आणि देशमुख हाॅटेल व वसमत रस्ता भागात तर दिवसभर हातगाडे विविध चौकात थांबलेले दिसून आले. शनिवारी दुपारी जशी पोलिसांनी वाहनांची धरपकड मोहीम विविध चौकात राबविली तशी मोहीम सोमवारी दुपारनंतर कुठेही दिसून आली नाही. यामुळे नागरिक बिनधास्त फिरत असल्याचे दिसून आले.