जिंतूर : तालुक्यातील २ हजार २८४ घरकुलांच्या लाभार्थ्यांना शासनाकडून १७ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचा निधी मिळाला नसल्याने या घरकुलांची कामे अर्धवट आहेत. यामुळे लाभार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिंतूर पंचायत समितीच्या वतीने २०१६-१७, २१७-१८ आणि २०१८-१९ या तीन वर्षांत ८८१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ८१२ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, ६९ घरकुले अर्धवट आहेत. ८८१ पैकी ३७९ घरकुलांच्या लाभार्थ्यांना चौथा हप्ता मिळालेला नाही तर७५ घरकुल लाभार्थ्यांना तिसरा आणि ३९ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळणे बाकी आहे. याच योजनेंतर्गत २०१९-२० व २०२०-२१ या वर्षात ४३७ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यातील केवळ ६४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. तब्बल ३७३ घरकुलांची कामे अपूर्ण आहेत.
रमाई आवास योजनेंतर्गत २०१६-१७, २०१७-१८ या दोन वर्षांत २ हजार ८९६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी २ हजार ३५६ घरकुले पूर्ण झाली आहेत. ५४० घरकुलांचे काम अद्यापही अर्धवट आहे. तर २०१९-२० या वर्षात या योजनेत २४७ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यातील एकाही घरकुलाचे काम अद्याप सुरू झाले नाही.
शबरी आवास योजनेंतर्गत २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षांत ४०७ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यापैकी केवळ ११२ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. पारधी आवास योजनेंतर्गत २०१७ ते २०१९ या कालावधीत ९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ७ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरकुलांची कामे अर्धवट आहेत. अनेक लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर झाल्यानंतर जुने घर पाडून नवीन घरकूल बांधण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांना वेळेवर शासनाचे अनुदान मिळाले नसल्याने त्यांच्या घराची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे ते सध्या अडचणीत सापडले आहेत.
१७ कोटी २५ लाखांची आवश्यकता
तालुक्यातील विविध योजनांतर्गत घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांच्या अनुदानापोटी १७ कोटी २५ लाख ५० हजार रुपये शासनाकडून येणे बाकी आहेत. त्यात ७४२ घरकुलांची पहिल्या हप्त्याची १ कोटी ११ लाख रुपयांची, दुसऱ्या हप्त्याची २ हजार २५२घरकुलांची ५ कोटी ६३ हजार ४० हजार, १ हजार ४८५ घरकुल लाभार्थ्यांची तिसऱ्या हप्त्याची ५ कोटी ९४ हजार आणि २ हजार २८४ घरकुलांच्या चौथ्या हप्त्याची ४ कोटी ५६ लाख ८० हजार अशी एकूण १७ कोटी २५लाख ५० हजार रुपयांची शासनाकडून रक्कम येणे बाकी आहे.