जिल्ह्यात ६८ दिवसांनंतर बुधवारी बाजारपेठ खुली झाली आहे. त्यामुळे खरेदीसाठी परभणी शहरासह जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या वेळी फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. काहींनी मास्कही वापरला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे ही बेफिकिरी तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी आहे. तिसरी लाट टाळायची असेल तर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन प्रत्येक व्यक्तीला करावे लागणार आहे. शिवाय पुढचा धोका लक्षात घेऊन प्रशासनानेही वेळप्रसंगी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांना आदेश दिले पाहिजेत.
मनपाच्या १५ पथकांची असेल नजर
परभणी शहरात गर्दीवर नियंत्रण मिळविण्याच्या अनुषंगाने तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी ६ पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
स्थापन केलेली पथके बाजारात फिरून मास्कचा वापर नागरिक किंवा व्यावसायिक करीत आहेत की नाहीत, याची पाहणी करणार आहेत. वेळप्रसंगी कारवाईही करणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकाने सुरू राहिल्यास अशा अस्थापनांवर मनपाच्या पथकांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
नागरिकांनी मास्कचा वापर करावा. मास्क न वापरणाऱ्यास १ हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. दुकानदारांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांचे दुकान सील केलेे जाणार आहे. त्यामुळे तिसरी लाट टाळण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे.
- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी
मास्कचा वापर; प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर केलाच पाहिजे
फिजिकल डिस्टन्स; सर्व ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचे पालन आवश्यक
सॅनिटायझरचा वापर; खबरदारी म्हणून हॅण्ड सॅनिटायझरचा वापर गरजेचा
२ मीटर अंतर आवश्यक; दोन व्यक्तींमध्ये किमान २ मीटर अंतर राखणे गरजेचे
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा; अनावश्यक घराबाहेर पडणे टाळणे गरजेचे