पुण्यात बेघर झालेली तरणी पोरं का म्हणतात, शिकायचं नाही, जगायचं आहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 04:51 PM2018-11-15T16:51:29+5:302018-11-15T16:55:20+5:30

पुणं. या एकाच शहरातलं एक दुसरं जग आहे. एकीकडे पुणं विद्येचं माहेरघर, आयटीचा चकचकाट. दुसरीकडे कालवा फुटल्यानं बेघर झालेली तरणी पोरं. त्यांची शाळा कधीच सुटली होती आता हातचं कामंही सुटलं. पुण्यात कालवा फुटल्यानंतर बेघर झालेल्या तरुण मुलांशी एक संवाद

a specail report about homless outh in pune | पुण्यात बेघर झालेली तरणी पोरं का म्हणतात, शिकायचं नाही, जगायचं आहे !

पुण्यात बेघर झालेली तरणी पोरं का म्हणतात, शिकायचं नाही, जगायचं आहे !

Next
ठळक मुद्देशिका म्हटलं की तेच सांगतात, शिकू की जगू, तुम्हीच सांगा !

- राहुल गायकवाड

झाडांच्या सान्निध्यात, आल्हाददायक वातावरण असलेल्या तीन मजली, रेखीव, सर्वसुविधांनी युक्त, पार्किगसाठी खास सोय असलेल्या मराठीच्या शब्दकोशातून शोधून काढलेत की काय अशी नावं असलेल्या सदाशिव पेठेतील इमारती. या इमारतीमधील प्रत्येकजण हा कोणी डॉक्टर, इंजिनिअर नाहीतर कोणी चार्टर्ड अकाउण्टण्ट. त्यांच्या मुलांच्याही अशाच काहीशा महत्त्वकांक्षा. या इमारतींच्या समोरच्या रस्त्याच्या पलीकडून वाहणारा सांडपाण्याचा अंबील ओढा. त्याच्या शेजारी दहा बाय दहाच्या खोल्यांची दांडेकर पूल वसाहत. घरात कोणी खोकलं तर त्याचा आवाज शेजारच्या घरात जाईल अशी इथली परिस्थिती. इथलं कोणी महापालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतं तर कोणी कपडय़ाच्या दुकानात काम करतं. त्यांच्या मुलांना कुठे छोटं-मोठं काम मिळावं एवढीच त्यांची महत्त्वकांक्षा..
27 सप्टेंबर 2018. हा दिवस या दांडेकर पूल वसाहतीत राहणार्‍या मुलांच्या मनात कायम कोरला गेला आहे. मुठा कालवा फुटून त्याचं पाणी या वसाहतीत शिरलं आणि अनेक घरांचं होत्याचं नव्हतं झालं. शेकडो कुटुंब रस्त्यावर आली. आधीच आयुष्यात अठराविसे दारिद्रय़. त्यात हे ओढवलेलं संकट. इथले तरु ण कुठे कपडय़ांच्या दुकानात नोकरी करत होते तर कोणी मेडिकलची औषधांची डिलिव्हरी करण्याचं काम करत होते. मुठा कालवा फुटून घर वाहून गेल्यानं कामाला आठवडाभर दांडी झाली. एकीकडे घर तर गेलंच दुसरीकडे नोकरीसुद्धा गेली. आता फक्त उजाड घराकडे बघत बसण्याशिवाय कुठला पर्याय त्यांच्याजवळ उरला नाही.
इथल्या अनेक तरुणांशी, शाळेत जाणार्‍या मुलांशी बोलायला गेलं की, कळतात अशा अनेक कहाण्या. कालवा दुर्घटनेनंतर त्यांचं आयुष्य बदललं खरं; पण जो बदल झाला तो त्यांच्यासाठी काही नवा नव्हता. आला दिवस पुढे ढकलत फक्त जगत राहायचं एवढंच त्यांना माहीत. त्यांच्या फारशा महत्त्वकांक्षा नाहीत. यातील अनेक तरुण हे त्यांच्या घरातील थोडंफार शिकलेली एकमेव व्यक्ती आहेत. मात्र आता त्यापैकी अनेकांचा शिक्षणावर विश्वास राहिला नाही. शिकून काय होणार आमची परिस्थिती बदलणार थोडीच आहे? असाच एखादा तक्रारसूर बोलता बोलता पुढं येतो, 
कुठं चार-पाच हजारांची नोकरी करायची अन् कुटुंबाला हातभार लावायचा एवढंच त्यांना महत्त्वाचं वाटतं. मोठय़ा घरात राहायला जायला आवडेल का? असं विचारल्यावर त्यांचं उत्तर हो असतं; पण पुढे जाऊन काय शिकायचं? असं विचारल्यावर शिकायला नाय आवडत असंच ते सांगतात. 
सर्वशिक्षा अभियान, रात्न शाळा, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया या योजना त्यांना माहीतच नाहीत. शिकल्यानं आपली प्रगती होईल, आपल्याला चांगली नोकरी लागेल त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत हे तर अनेकांसाठी एक स्वप्नच आहे.
रितेश माने. 16 वर्षाचा त्यानं नववीत शाळा सोडली. त्यानं शाळा सोडल्याचं त्याच्या घरच्यांना फारसं नवलं वाटलं नाही, उलट त्यांच्यासाठी एकप्रकारे बरंच झालं. रितेश डेक्कन येथील एका ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करतो. त्यानं शाळा का सोडली, हे विचारल्यावर शाळा शिकायला आवडत नाही असं तो म्हणाला. आयुष्यात पुढे काय करणार? असं विचारल्यावर म्हणाला, कुठंतरी एखादी जास्त पगाराची नोकरी मिळवायची एवढंच तो सांगतो. 
इथलाच संकेत भोसले. दहावीर्पयत शिकलाय. त्याला पुढे जाऊन गणपतीत गाणी वाजवणारा डीजे व्हायचंय. पुढं जाऊन फारसं शिकायची मात्र त्याची इच्छा नाही. 
अजय चवतमाळ. त्याला पोलीस व्हायचंय त्यासाठी कष्ट घेण्याची त्याची तयारी आहे; परंतु योग्य मार्गदर्शन करणारं कोणी मिळालं नाही तर काय हा प्रश्न त्याला छळतोय. पोलीस होण्यासाठी काय करावं लागतं हेच त्याला माहीत नाही. घरात एकटाच इतका शिकलाय त्यामुळे घरच्यांना शिक्षणातलं काहीच माहीत नाही.


इथला सौरभ गायकवाड सध्या अकरावीला आहे. सौरभ मेडिकलच्या औषधांची डिलिव्हरी करण्याचे काम करायचा. मुठा कालवा दुर्घटनेमुळे जॉबला काही दिवस जाता आलं नाही, त्यामुळे कामावरून काढून टाकण्यात आलं. एका रेडिओच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणार्‍या आकाश कांबळेलासुद्धा याच कारणानं काम सोडावं लागलं. गेला महिनाभर हे तरुण वसाहतीतल्या कट्टय़ावर बसून राहण्यापलीकडे काहीही करत नाहीत. 
त्यांच्यात काही करण्याची इच्छा नाही किंवा धमक नाही का?
 तर असं काही नाही. ती आहेच.


पण करायचं काय नि कसं हे सांगणारं कुणी नाही. ज्या वस्तीत राहतात त्या वस्तीत फारसं कोणी शिकलं नाही. त्यामुळे कुठेतरी ऑफिस बॉय, डिलिव्हरी बॉय, कपडय़ांच्या दुकानात काम करायचं इतकंच काय ते यांचं करिअर. त्यातही कालवा फुटल्यासारखी एखादी आपत्ती आल्यानंतर कामावर पाणी सोडणं आलंच. इथल्या प्रत्येक तरुणाचे चेहरे सारखेच वाटतात. निर्विकार ! शहरातल्या काचेच्या इमारती, झगमगाट, मॉल्स ते पाहतात; परंतु त्यांच्यासाठी या गोष्टी म्हणजे एकाच शहरातलं दुसरं जग आहे. ज्या जगात त्यांना प्रवेश नाही. ज्या जगात राहण्याची त्यांची ऐपत नाही. ओढय़ाच्या पलीकडच्या पेठांमध्ये आठवडय़ाला करिअर काउन्सिलिंगचे सेमिनार होत असतात, तर ओढय़ाच्या या बाजूला करिअर म्हणजे नेमकं  काय? हाच प्रश्न पडलेला असतो. पुण्यातल्या अनेक नाक्यांवर पाहिलं तर या तरुणांसारखे शेकडो तरु ण उभे असतात. दुष्काळ आणि गरिबी पाचवीला पुजलेली असताना करिअरचा विचार तो कोण करणार? छोट छोटय़ा गावांमधील, वस्त्यांमधील तरुणांची पावलं शहरामध्ये मजुरीच्या शोधात फिरत असतात.  शिक्षणावरील विश्वास उडालेले अनेक रितेश शहरांमध्ये फिरतायेत. त्यांच्यासाठी करिअरपेक्षा जिवंत राहणं जास्त महत्त्वाचं आहे. आमच्याकडे शिक्षण आहे; पण ते शिक्षण का घ्यायचं याचं उत्तर नाही. 
ही पोरं म्हणतात, शिक्षणापेक्षा जिवंत राहणं महत्त्वाचं.
त्यावेळी काय समजवणार त्यांना?
     
 

Web Title: a specail report about homless outh in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.