पर्थ : आॅस्ट्रेलिया दौ-यात कामगिरी सुधारण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध उद्या, शुक्रवारी खेळल्या जाणा-या तिरंगी मालिकेतील उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या लढतीत सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. अंतिम फेरीत स्थान मिळविणाऱ्या आॅस्ट्रेलियाविरुद्धची यापूर्वीची लढत पावसामुळे रद्द झाल्यामुळे भारताच्या खात्यावर दोन गुणांची नोंद झाली. मिळालेल्या या संधीचा लाभ घेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघापुढे उद्याच्या लढतीत फलंदाजी व गोलंदाजीच्या कामगिरीत सुधारणा करण्याचे आव्हान आहे.साखळी फेरीत विजयाचे खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघाला पहिल्या लढतीत २६७ धावा फटकाविल्यानंतरही पराभव स्वीकारावा लागला, तर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ १५३ धावांत गारद झाला. पहिल्या लढतीत १३८ धावा पटकाविणाऱ्या रोहित शर्माला त्यानंतर दुखापतीमुळे दोन सामन्यांत खेळता आले नाही. रोहितवर सर्वांची नजर आहे. विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संघव्यवस्थापन रोहितबाबत जोखीम पत्करण्यास तयार नाही. वाका मैदानावर बुधवारी फिटनेस चाचणीनंतर रोहितने काहीवेळ नेट््समध्ये सराव केला. त्यानंतरही तो निवडसाठी उपलब्ध नसल्याचे संकेत मिळत आहेत. अजिंक्य रहाणेचा फलंदाजी क्रम अद्याप निश्चित झालेला नसून अंबाती रायडू तिसऱ्या क्रमांकावर संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. शिखर धवनचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. त्याने तीन सामन्यांत केवळ ११ धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाच सामन्यांत ३६३ धावा फटकावित स्पर्धावीर पुरस्काराचा मानकरी ठरल्यानंतर धवनला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. विराट कोहलीला चौथ्या कमांकावर मोठी खेळी करता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये कसोटी मालिकेत अपयशी ठरल्यानंतर वन-डेमध्येही भारतीय गोलंदाज खोऱ्याने धावा बहाल करीत असून, विकेट घेण्यात अपयशी ठरत आहेत. (वृत्तसंस्था)
आज ‘सेमीफायनल’
By admin | Updated: January 30, 2015 00:53 IST