नवी दिल्ली : जगमोहन दालमिया यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयचे नवीन पदाधिकारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मंडळाच्या प्रतिनिधीरूपाने असलेल्या श्रीनिवासन यांची उचलबांगडी करण्यासाठी लवकरच सर्वसाधारण सभेची विशेष बैठक आयोजित करण्याच्या पर्यायावर विचार करीत आहेत.श्रीनिवासन यांना बाहेर करण्याच्या निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी सर्वसाधारण सभेची विशेष बैठक बोलावण्याची आवश्यकता असणार आहे आणि दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर या पर्यायावर विचार करीत आहेत. तथापि, कोणत्या दिवशी ही सर्वसाधारण सभेची विशेष बैठक अयोजित करण्यात येणार यावर अद्याप निर्णय झाला नाही. कारण बैठक बोलावण्यासाठी सदस्यांना तीन आठवड्यांची नोटीस देणे आवश्यक असते.बीसीसीआयच्या एका सदस्याने म्हटले की, ‘श्रीनिवासन यांना बाहेर करण्यासाठी सत्ताधारी गटाला दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. जर त्यांच्या जवळ २१ संघटनांची मते नसतील, तर निश्चितपणे त्यांना सर्वसाधारण सभेची विशेष बैठक बोलावता येणार नाही. त्यामुळे दालमिया आणि ठाकूर यांना त्यांच्या बाजूने २१ मते आहेत का हे आधी चाचपडून पाहावे लागणार आहे.’ (वृत्तसंस्था)प्राप्त वृत्तानुसार २१ मे रोजी या बैठकीचे आयोजन केले जाऊ शकते. त्याच दिवशी यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना देखील होणार आहे. विशेष म्हणजे २0१0 मध्ये ललित मोदी यांना देखील आयपीएलच्या तिसऱ्या सत्राच्या अंतिम सामन्यानंतर निलंबित करण्यात आले होते. त्यामुळेच प्रकरणाचा काय निकाल लागतो याची उत्सुकता लागली आहे.
श्रीनिवासन यांना हटवण्याचा विचार होत आहे
By admin | Updated: April 30, 2015 01:36 IST