मुंबई : थरारक सामन्यांची मालिका असलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कबड्डीप्रेमी अक्षरश: थरारक सामन्यांची मालिका पाहाण्याचे भाग्य लाभले. सामना संपायला शेवटची दोन मिनीटे असताना 36-29 अशी मोठी आघाडी असलेल्या पुण्याच्या घशात हात घालून अरविंद पाटील आणि राहुल सवर या दोघांनी विजयाचा घास काढून घेत पालघरला 38-37 असा अनपेक्षित विजय मिळवून दिला आणि बाद फेरीतही उडी मारली.
दुसरीकडे रत्नागिरीविरूद्धची लढत 27-27 अशी बरोबरीत सुटल्यामुळे दादासो आवाडचा झुंजार नंदूरबार साखळीतच बाद झाला. अहमदनगरविरूद्ध पिछाडीनंतरही 39-36 अशी मात करून कोल्हापूरने विजयी सलामी दिली, पण मुंबइविरूद्ध त्यांना 38-14 असा दारूण पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतरही कोल्हापूर बाद फेरीत पोहोचली असून उपांत्यफेरीत पोहोचण्यासाठी त्यांनी बलाढ्य रायगडला नमवावे लागेल. तसेच रत्नागिरी विरूद्ध सांगली, मुंबई विरूद्ध पालघर आणि उपनगर विरूद्ध ठाणे अशा बाद फेरीत चकमकी होणार आहेत.
पुणे आणि पालघर हे दोन्ही संघ साखळीत सलामीला हरल्यामुळे त्यांच्यात "करो या मरो" लढत होती. या सामन्यात अक्षय शिंदे आणि पवन करंडेच्या चढायांमुळे पालघरपेक्षा पुणे सरस वाटत होती. पुण्याने 18-16 अशी दोन गुणांची आघाडीही घेतली होती. सामना संपायला शेवटची 2 मिनीटे शिलल्क असताना पुण्याकडे 34-29 अशी मोठी आघाडीसुद्धा होती. विजय पुण्याच्या आवाक्यात होता. त्यांचे चढाईबहाद्दर वेळ काढण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हाच अरविंद पाटील अफलातून चढाई करीत एक गुण मिळविला. पुण्यानेही पुढील दोन चढाईत गुण मिळवित गुणफलक 36-31 असा आपल्याकडेच ठेवला. तेव्हाच अरविंद पाटीलने चपळपणे पुण्याच्या तीन खेळाडूंना बाद करून सामन्यात रंजकता आणली. 34-36 गुणफलक असताना अक्षय वधानेने एक गुण मिळवून पुण्याला 37-34 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर राहुल सवर सामन्याची शेवटची चढाई करण्यासाठी सुसाट निघाला. मैदानात पुण्याचे दोन खेळाडू होते आणि राहुलने त्या दोघांनाही टिपत पालघरला लोणच्या दोन गुणासह चार गुण मिळवून देत 38-37 असा विजय मिळवून दिला. या विजयामुळे पालघर बाद फेरीत पोहोचला तर पुण्याचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.
दुर्दैवी नंदुरबार
स्पर्धेच्या उद्घाटनीय लढतीत ठाण्याविरुद्ध अवघ्या एका गुणाने पराभव पत्करल्यानंतर नंदुरबारला आपल्या दुसऱ्या सामन्यातही दुर्दैवी पराभवाला सामोरे जावे लागले. रत्नागिरीविरुद्ध झालेल्या स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात कबड्डी प्रेमींना टाय सामन्याचा थरार अनुभवता आला. बलाढ्य रत्नागिरी शेवटचे 3 मिनिट असताना 22-19 ने पुढे होती. रत्नागिरीच्या चढाईपटूंनी गुणांची कमाई करत गुणफलक 25-20 असा केला.
सामना रत्नागिरीच्या बाजूने झुकत असताना दादासो आवाडने खोलवर चढाई करीत नंदुरबारच्या खात्यात सामन्याची रंगत वाढवणारे 3 गुण नोंदविले. मग पुढच्याच चढाईत नंदूरबारच्या शिवराज जाधवची 3 खेळाडूंत अजिंक्य पवारने अफलातून पकड केली आणि रत्नागिरीला 27-24 असे आघाडीवर नेले. मग शेवटच्या मिनिटाला दादासोने एक गुण मिळवून देणारी चढाई केली. मग रत्नागिरीच्या रोहन गमरेची पकड केली. त्यानंतर सामन्याची शेवटची चढाई करण्यासाठी दादासो पुढे सरसावला. मैदानात रत्नागिरीचे 2 खेळाडू होते. दादासोने दोघांना टिपण्याचे कसोशीने प्रयत्न केले, पण तो दुर्दैवी ठरला. तो एकालाच बाद करू शकला आणि सामना 27-27 असा बरोबरीत सुटला. जर दादासो दोघांना बाद करण्यात यशस्वी ठरला असता तर नंदुरबार सामनाच जिंकला नसता तर बाद फेरीतही पोहोचला असता.
मुंबई, रायगड, उपनगर नॉनस्टॉप
साखळी सामन्यात मुंबई शहर, रायगड आणि मुंबई उपनगर या तिन्ही संघांनी आपापले दोन्ही सामने जिंकले तर पुणे, नाशिक, अहमदनगर या तीन संघांना दोन्ही सामन्यात पराभवाना सामोरे जावे लागले. नंदुरबार एक सामना एका गुणाने हरला तर दुसरा सामना बरोबरीत सुटल्यामुळे स्पर्धेबाहेर फेकला गेला. उर्वरित 5 संघांनी एक-एक विजय मिळवले.