कोची : आयपीएल २०१३च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयाने वेगवान गोलंदाज श्रीसंत निर्दोष असल्याचा निर्णय दिला असून, त्याच्यावर असलेली बंदीची शिक्षा चुकीची आहे, असे मत केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री चंडी यांनी वादग्रस्त गोलंदाज श्रीसंतची पाठराखण केली. दोन वर्षांनंतर आपली कारकीर्द पुन्हा प्रारंभ करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या श्रीसंतचे समर्थन करताना चंडी म्हणाले, ‘‘अन्याय व्हायला नको. या प्रकरणात बीसीसीआयची भूमिका योग्य असल्याचे मला वाटत नाही. न्यायालयाने स्पॉट फिक्सिंगप्रकरणात श्रीसंत निर्दोष असल्याचा निर्णय दिला आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने निर्णयाचा स्वीकार करायला पाहिजे आणि बंदीची शिक्षा रद्द करायला पाहिजे.’’ श्रीसंत, फिरकीपटू अंकित चव्हाण आणि अजित चंदीला यांच्यासह ३६ आरोपींना दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने गेल्या महिन्यात निर्दोषमुक्त केले, पण बीसीसीआयने बंदीची शिक्षा रद्द करण्यास नकार दिला.
श्रीसंतवर बंदी कायम राखणे चुकीचे : ओमन चंडी
By admin | Published: August 02, 2015 11:30 PM