कराची : प्रस्तावित भारत - पाक मालिकेसंबधी होत असलेल्या विलंबामुळे अजूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान नाराज असून त्यांनी यासंबंधी आपली नाराजी स्पष्ट व्यक्त करताना मुंबईत झालेल्या विरोधासंबधी कठोर शब्दांत एक पत्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पाठवले आहे. यावेळी त्यांनी आपल्याला योग्य प्रकारे वागणूक मिळाली नसल्याचे सांगताना पीसीबी अधिकारी मंडळावीरोधात झालेल्या तीव्र आंदोलनाबाबत निराशाही व्यक्त केली.बीसीसीआयच्या एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार खान यांनी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांना पत्र पाठवून कठोर शब्दांत आपली नारजी व्यक्त केली. यामध्ये खान यांनी म्हटले आहे की, बीसीसीआयच्या निमंत्रनावरुन पीसीबी मंडळाचे अधिकारी चर्चा करण्यासाठी भारतात आले होते. मात्र बीसीसीआयने योग्य प्रकारे आमचे स्वागत केले नाही. तसेच प्रस्तावित मालिकेसंबधी भारताकडून होणाऱ्या विलंबावरुनही त्यांनी आपली निराशा जाहीर केली. त्याचप्रमाणे शहरयार यांनी मनोहर यांना प्रस्तावित मालिकेबाबत आपली भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करण्याचे सांगितले असल्याचीही माहिती मिळाली आहे. (वृत्तसंस्था)
शहरयार यांचे बीसीसीआयला पत्र
By admin | Updated: October 24, 2015 04:15 IST