गोलंदाज जर आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी कुण्या शहराची निवड करणार असतील तर ते शहर आहे गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआर संघाचे गृहशहर कोलकाता. विशेषत: फिरकीपटूंसाठी येथील खेळपट्टी नंदनवन आहे. आमच्यावर मोजकेच लोक विश्वास करतात, पण गंभीर मात्र आपले भविष्य आमच्या हातात सोपवितो, असे फिरकीपटूंचे मत असावे, असे वाटते. दुसरी व्यक्ती आम्हाला अधिक महत्त्व देत नसताना गंभीर मात्र आमच्यासाठी ‘रेड कार्पेट’ टाकतो. अन्य व्यक्ती आमच्याकडे पाहुणे कलाकार म्हणून बघत असले तरी गंभीर मात्र आम्हाला विचारात घेऊन रणनीती ठरवत असतो. गेल्या लढतीत केकेआर संघात जवळजवळ अर्धे गोलंदाज होते. फिरकीपटूंची गर्दी होती, तर मॉर्केलच्या रूपाने दर्जेदार वेगवान गोलंदाज. वेगवान मारा असो किंवा फिरकी; त्याचप्रमाणे सिम, नियमित आणि चायनामन हे सर्व पर्याय त्याच्याकडे होते. केकेआर संघाची गोलंदाजीची बाजू म्हणजे भोजनाच्या टेबलवर सर्व प्रकारचे रुचकर व्यंजन असल्याप्रमाणे आहे. टी-२०मध्ये प्रत्येक कर्णधार विचार करतो, की २० षटकांमध्ये १० बळी घेणे कठीण काम आहे, पण गंभीर मात्र १० विकेटसाठी १० चेंडू पुरेसे असल्याचा विचार करतो. महान वसीम अक्रमच्या उपस्थितीचा खेळाडूंना लाभ मिळत आहे. समतोल साधण्यासाठी खेळाडूंच्या लिलावामध्ये संघाने आपली रक्कम विचारपूर्वक खर्च केल्याचे दिसून येते, पण सुरुवातीला असे नव्हते. तुम्हाला आठवत असेल आयपीएलच्या सुरुवातीच्या मोसमात संघाने गेल, पाँटिंग, मॅक्युलम आणि गांगुली यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश केला होता. तीन सत्रांत निराशाजनक कामगिरीनंतर हा बदल घडला. सन २०११मध्ये गंभीर जुळल्यानंतर हा संघ वेगळा भासायला लागला. क्रिकेटच्या या प्रकारात टी-२० जाणकार काही बाबींवर विशेष भर देतात. त्याचा सखोल विचार होणे आवश्यक आहे. तुम्ही आपल्या आघाडीच्या दोन फलंदाजांपैकी एकाकडून किमान १०० धावांची किंवा आघाडीच्या फळीतील प्रत्येक फलंदाजकडून किमान ३०-४० धावांच्या योगदानाची अपेक्षा ठेवता. रॉयल चॅलेंजर्सच्या आघाडीच्या चार फलंदाजांपैकी एक फलंदाज १०० धावांचा पल्ला गाठेल, असे घडू शकते, पण २० षटकांमध्ये अशी कामगिरी प्रत्येक फलंदाजाकडून होण्याची शक्यता नसते. दिग्गज फलंदाजांचा समावेश असलेल्या आरसीबीसारख्या संघालाही रविवारच्या लढतीत अखेरच्या चार षटकांमध्ये धावा फटकावणे अडचणीचे झाले होते. त्यामुळे एकच विभाग मजबूत करण्यापेक्षा सर्वच विभागांवर लक्ष पुरविणे महत्त्वाचे ठरते. दरम्यान, सलामीवीरांचा अपवाद वगळता केकेआर संघातील अन्य खेळाडूंची अद्याप परीक्षा झालेली नाही. त्यांचे सलामीवीर केवळ मोठ्या धावसंख्येचा पाया रचत नसून अखेरच्या षटकापर्यंत तळ ठोकत आहेत. अखेर त्यांच्या संघात दर्जेदार अष्टपैलूंचा समावेश आहे. या अष्टपैलूंची केवळ षटकार ठोकण्याला पसंती असते. दुसऱ्या बाजूचा विचार करता पंजाब संघात अलीकडेच मिळवलेल्या विजयामुळे उत्साह आहे. (टीएमसी)
कोलकाता गोलंदाजांसाठी नंदनवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2016 03:37 IST