मुंबई : आयपीएलमध्ये दोन वर्षांपासून स्वत:चे स्थानिक सामने दुसऱ्या मैदानावर खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सला स्थानिक मैदानाची उणीव जाणवत आहे. या संघाचा सल्लागार राहुल द्रविड याने ही खंत व्यक्त केली; पण इतरत्र खेळण्यासाठी आम्ही मानसिकरीत्या सज्ज झाल्याचेही तो म्हणाला.संघाचा माजी कर्णधार आणि आता सल्लागार बनलेला द्रविड म्हणाला, ‘मागच्या वर्षी आम्ही अहमदाबाद हे स्थानिक मैदान निवडले होते. यंदा मुंबईत खेळणार आहोत. आम्हाला सवाई मानसिंग स्टेडियमची उणीव जाणवते. त्या मैदानावर आमचा रेकॉर्डदेखील चांगला आहे.’ राजस्थानने मानसिंग स्टेडियमवर पहिल्या सहा पर्वांतील ३८ पैकी २९ सामने जिंकले हे विशेष. २०१४ साली मात्र आरसीएला सरकारकडून परवानगी न मिळाल्याने शहरात एकही सामना आयोजित होऊ शकला नाही. तेव्हापासून हे प्रकरण लालफितशाहीत अडकले आहे. आरसीएने अहमदाबादच्या मोतेरा मैदानावर चारपैकी दोन सामने जिंकले आहेत. २०१५ च्या पर्वात आम्ही या मैदानावर अधिक सामने जिंकू, असा विश्वास द्रविडने व्यक्त केला. यंदा आठव्या पर्वात मुंबईच्या स्थानिक मैदानावर राजस्थान रॉयल्सला तीन सामने खेळायचे आहेत. यावर द्रविड म्हणाला, ‘आमच्या संघासाठी यंदा परिस्थिती वेगळी आहे. अहमदाबाद येथे खेळल्यानंतर आता क्रिकेट क्लब आॅफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळावे लागत आहे. येथे सरावासाठी सर्व खेळाडू उत्सुक आहेत.’ कामगिरीत सातत्य राखणारे आणि दडपणातही उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू टी-२० क्रिकेटला हवे आहेत. विजयाची भूक असेल तर या प्रकारात निश्चितपणे विजय मिळत असल्याचे द्रविडने सांगितले. (वृत्तसंस्था)
स्थानिक मैदानाची उणीव जाणवते : द्रविड
By admin | Updated: April 10, 2015 08:59 IST