बंगळुरू: फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २०१८ च्या पात्रता फेरीत मंगळवारी (दि. ८) भारताची लढत बलाढ्य इराणशी होणार आहे. कांतिवीरा स्टेडियमवर हा सामना होत आहे. जागतिक क्रमवारीत भारत १५५ व्या, तर इराण ४० व्या स्थानी आहे. बलाढ्य इराण या सामन्यात बाजी मारेल, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र घरच्या मैदानावर होत असलेल्या सामन्याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो. स्पर्धेच्या ग्रुप डी गटात इराण आघाडीवर आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यांनंतर इराणचे ४ गुण झाले आहेत. जून महिन्यात तुर्कमेनिस्तान संघाशी झालेली इराणची लढत १-१ अशी बरोबरीत सुटली होती. याविषयी बोलताना इराणचा कर्णधार एन्ड्रानिक तिमोरियन म्हणाला, ‘‘प्रत्येक सामना हे एक आव्हान असते. त्यामुळे फुटबॉलमध्ये प्रत्येक वेळी पुढचा विचार करावा लागतो. या मैदानावर सर्वोत्तम खेळी करून जिंकण्याच्याच निर्धाराने उतरू. विजयासह तीन गुण मिळविण्याची ही संधी आम्ही नक्कीच गमावणार नाही. (वृत्तसंस्था)
भारतासमोर इराणचे आव्हान
By admin | Updated: September 8, 2015 04:37 IST