राजीव शुक्ला : योग्य वातावरण असेल तरच भारत पाकमध्ये खेळेलनवी दिल्ली : पाकमध्ये सुरक्षेची संपूर्ण हमी असेल आणि क्रिकेट खेळण्यास योग्य वातावरण असेल तरच भारतीय संघ तेथे खेळेल, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे.जियो न्यूज चॅनेलशी बोलताना शुक्ला म्हणाले, ‘पाकने लाहोरसारख्या शहरात सुरक्षित माहोल तयार केल्यास तसेच स्टेडियमशेजारी खेळाडूंच्या निवासासाठी हॉटेल असल्यास भारताला पाकमध्ये खेळण्याची अॅलर्जी नाही. पाकने आयसीसीला सुरक्षेचे संपूर्ण वचन दिल्यास आमचा संघ पाक दौरा करू शकतो. पाकला देशात क्रिकेट व्हावे असे वाटत असेल तर यूएईत सामन्यांचे आयोजन न करता घरचा माहोल शांत करण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असा सल्ला देखील शुक्ला यांनी दिला. पाक सातत्यात यूएईत खेळत राहिल्यास त्यांच्या क्रिकेटचे नुकसान होईल. त्याऐवजी लाहोर क्रिकेटसाठी सुरक्षित स्थळ बनवावे. स्टेडियम शेजारी हॉटेल बनविल्यास पाहुणे संघ येथेच वास्तव्य करतील. या सुरक्षेमुळे प्रत्येक संघ पाकमध्ये खेळण्यास तयार होईल, असा मला विश्वास आहे.’भारत-पाकमध्ये डिसेंबर महिन्यात प्रस्तावित असलेल्या द्विपक्षीय मालिकेवरून सध्या वादळ उठले असताना शुक्ला यांनी स्पष्ट केले की, या मालिकेबाबत उभय देशात समझोता करार झाला होता, पण त्यावेळी बीसीसीआय आणि आयसीसीचे नेतृत्व अन्य व्यक्तीकडे होते. बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष मात्र एकमेकांविरुद्ध आणि एकमेकांच्या देशात खेळण्याचे समर्थ करीत आहेत. पाकला घरच्या मालिकेत होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यास आम्ही तयार आहोत. पाकमधील स्थिती सुधारेल तेव्हा आम्ही तेथे जाऊन एक काय तर दोन मालिका खेळू. आम्हाला हरकत नाही. पाकने भारतात खेळण्यास कळीचा मुद्दा बनवू नये. पाक संघाला भारतात संपूर्ण सुरक्षा मिळेल. याशिवाय मोबदला देखील मिळेल. हा वादाचा मुद्दा होऊ नये. दुबईत खेळण्यासाठी पाकने भारतावर सातत्याने दडपण आणू नये, असेही शुक्ला म्हणाले. (वृत्तसंस्था)‘आम्ही आमच्या धोरणानुसारच चालू’दुबईत खेळण्यास काय हरकत आहे, असा सवाल करताच शुक्ला म्हणाले, ‘ अन्य देश काय विचार करतात त्याचेशी देणेघेणे नाही. आम्ही धोरणानुसार चालणार आहोत. भारत-पाक सरकारने आपापल्या देशातील माहोल खेळासाठी कसे चांगले होईल याकडे लक्ष द्यावे. अन्य देशांवर विसंबून राहू नये. पाकमध्ये एक घटना घडली म्हणून तेथे क्रिकेट होऊ शकत नाही, असा अन्वयार्थ काढण्यात येऊ नये.’ पीसीबी अध्यक्ष शहरयार खान मुंबई दौऱ्यावर आले असता बीसीसीआय मुख्यालयावर शिवसैनिकांनी धुडगूस घातला. या घटनेचा बचाव करीत शुक्ला म्हणाले, ‘शिवसैनिकांनी बीसीसीआय विरोधात घोषणाबाजी केली तरी पाक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेला कुठलाही धोका नव्हता. यानंतरही बीसीसीआय पाकसोबत मालिका आयोजनास तयार आहे हे कमी नाही.’भारतात खेळण्याचा प्रश्नच नाही : शहरयारडिसेंबरमध्ये प्रस्तावित द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी पाक संघ भारतात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा पुनरुच्चार पीसीबीचे चेअरमन शहरयार खान यांनी शनिवारी केला. पत्रकारांशी बोलताना शहरयार म्हणाले, ‘भारतात खेळणार नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले. हा प्रश्न आता राजकीय बनला आहे. मालिकेचा अंतिम निर्णय मी स्वत: घेईन, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही म्हटले आहे. पीसीबीने आपली भूमिका बीसीसीआय तसेच नवाज यांच्यापुढे ठेवली. दुबईत आयसीसी बैठकीनंतर बीसीसीआय अध्यक्ष मनोहर यांची भेट घेणार आहे.’भारताने यूएईत खेळण्यास आधीच नकार दिला असून पाक भारतात खेळणार असेल तरच मालिका होईल, असे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले. पीसीबी प्रमुख म्हणाले, ‘मालिका व्हावी असे आम्हाला देखील वाटते पण भारत समझोत्याचा सन्मान करताना दिसत नाही.’एमओयूचे भारतावर दडपण : नजम सेठीदरम्यान, पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी मालिकेसंदर्भात झालेला समझोता करार कृतीत आणण्याचे मोठे दडपण भारतावर असल्याचे म्हटले आहे. २०१५ ते २०२३ या काळात भारत-पाकला एकमेकांच्या देशांत सहा मालिका खेळायच्या आहेत. हा एमओयू झाला त्यावेळी सेठी पीसीबीचे अध्यक्ष होते. ईसीबीचे प्रमुख जाईल्स क्लार्क हे आयसीसीत पाक क्रिकेट प्रमुख आहेत. मालिका आयोजनासंदर्भात ते मनोहर यांच्यासोबत दुबईत बैठक करतील. पाकमध्ये राष्ट्रकुल क्रिकेट संघ पाठविण्याचा त्यांचा विचार असून त्यासाठी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ते लाहोरचा दौरा करणार आहेत.
पाकमध्ये सुरक्षेची हमी द्या
By admin | Updated: November 22, 2015 04:13 IST