नवी दिल्ली : विश्वविजेत्याचा चषक भारतीयांच्या स्वाधीन करणारा, भारतीय क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी ‘कॅप्टन’ महेंद्रसिंह धोनीवरच आज चाहत्यांनी हल्लाबोल चढविला आहे. चारही बाजूंनी धोनीवर टीका केली जात आहे. त्यामुळे धोनीपर्व समाप्तीकडे वाटचाल करीत असल्याची भावना निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर टी-२० आणि त्यानंतर पहिला एकदिवसीय सामना गमावल्यानंतर त्यात आणखीच भर पडली. ज्याच्या नेतृत्वाखाली आयसीसी टी-२०, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन ट्रॉफी भारतीयांनी मिळविली, तो सर्वांत यशस्वी कर्णधार आज पराभवाच्या गर्तेत अडकला. त्यामुळे त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार होत आहे. याच कारणामुळे गेल्या वर्षी धोनीवर आॅस्ट्रेलिया दौऱ्यातून कसोटी क्रिकेटला ‘अलविदा’ करण्याची वेळ आली होती. मात्र, वन-डेमध्ये तो कर्णधार म्हणून आणि एक फलंदाज म्हणूनही अपयशी ठरत आहे. कानपूरच्या खेळीवर प्रश्न! सर्वाेत्कृष्ट ‘फिनिशर’ म्हणून प्रसिद्ध महेंद्रसिंह धोनी कानपूर येथे टीम इंडियाला विजयापर्यंतही नेऊ शकला नाही. आता क्रिकेट विश्लेषकांबरोबरच माजी क्रिकेटपटूंनीसुद्धा मान्य केले, की धोनी करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. कानपूर येथे धावांसाठी ज्या पद्धतीने धोनी संघर्ष करीत होता, त्यावरून हे बरेचसे जाणवले. पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या धोनीने ३० चेंडूंत ३१ धावा केल्या. यात त्याला एकही चौकार खेचता आला नाही. त्याच्या याच संथ खेळीने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाची अडचण अधिक वाढली होती. संघावर दडपण वाढले. ज्यामुळे, भारताने अवघ्या ५ धावांनी हा सामना गमावला. धोनीने रोहित शर्मासोबत ५५ धावांची भागीदारी केली; मात्र धोनी एका-एका धावेसाठी संघर्ष करीत होता.कर्णधार म्हणून धोनीची २००७ पासूनची कारकीर्द...आयसीसीच्या टी-२० वर्ल्डकप (२००७), वर्ल्डकप(२०११), चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१३) तीन्ही प्रारुपातील विजेतेपद जिंकली.इंडियन प्रिमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जला दोन वेळा विजेतेपद मिळवून दिले. चॅम्पियन लीगमध्ये आपल्या संघाला विजेतेपद जिंकून दिले. इतर जेतेपद२००८ कॉमन वेल्थ बँक सिरीज (आॅस्ट्रेलिया)२००९ श्रीलंका येथे कॉम्पॅक्ट चषक२०१० श्रीलंका एशिया कप२०१३ कॅरिबियन सेलकोन मोबाईल कप यासह ११ वन-डे मालिका जिंकल्या.> काय म्हणतात माजी खेळाडू..धोनीला ‘बळीचा बकरा’ बनवले जातेय - सुनील गावस्करटीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला ‘बळीचा बकरा’ बनवले जात असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त करून त्याची पाठराखण केली आहे. धोनी अजूनही भारताचा नंबर एक ‘फिनिशर’ आहे. ही गोष्ट वेगळी, की वाढत्या वयानुसार माणसाची शक्ती कमी होते. हे फक्त खेळामध्येच नव्हे, तर इतर दुसऱ्या गोष्टींमध्ये लागू होते. संघ हरतो तेव्हा कुणाला तरी बळीचा बकरा बनवले जाते.या वेळी पराभवाचे खापर धोनीवर फोडले जात आहे हे योग्य नाही, असेही गावस्कर म्हणाले.काही वर्षांपासून धोनीने देशाला गौरव मिळवून दिला. त्यामुळे एका खराब कामगिरीमुळे त्याचे योगदान विसरता कामा नये. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाला गोलंदाज कारणीभूत आहेत. - जेव्हा चेंडू धोनीच्या आजूबाजूने असायचा, तेव्हा तो त्याला उत्तमरीत्या खेळायचा. आता मात्र असे होत नाही. गोलंदाजांनाही माहीत झाले आहे, की धोनीमध्ये पहिल्यासारखी चपळता उरलेली नाही. त्याच्यात आजही क्षमता आहे; पण पहिल्यासारखा धोनी पाहायला मिळेल, असे दिसत नाही. - के. श्रीकांत > धोनीने आता इतर खेळाडूंसमोर एक उदाहरण म्हणून उभे राहण्याची गरज आहे. तर, आगरकरने धोनीच्या जागी विराट कोहलीवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्याचा सल्ला दिला आहे. - अझहरुद्दीन, > धोनी आजही उत्कृष्ट फिनिशर असल्याचे वाटते. मला नाही वाटत, की त्याची भूमिका बदलली आहे. नंबर चारवर खेळावा असेही वाटत नाही. तो आपल्या लयीत पुन्हा परतेल आणि लोक पुन्हा वेगळ्या पद्धतीने बोलतील. - अनिल कुंबळे
धोनीपर्व समाप्तीकडे?
By admin | Updated: October 12, 2015 23:59 IST