नवी मुंबई - इन्स्टाग्रामवरून एका ४६ वर्षीय महिलेची एका व्यक्तीसोबत ओळख झाली. या मैत्रीतूनच तिला ५० लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली. ही महिला दिवा गाव परिसरात राहणारी आहे.
इन्स्टाग्रामवरील त्या मित्राने अमेरिकेतून भेटवस्तू पाठवल्याचे संबंधित महिलेला सांगितले होते. यानंतर आक्षेपार्ह पार्सल आल्याच्या बहाण्याने कारवाईचा धाक दाखवून तिच्याकडून ५० लाख उकळले. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पार्सलमध्ये आक्षेपार्ह गोष्टी दिवा गाव परिसरात राहणाऱ्या महिलेची इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. तीन महिन्यात दोघांमध्ये चांगली मैत्री झाली असता त्या ऑनलाईन मित्राने तिला महागडे गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले होते. यानंतर काहीच दिवसात त्यांना दिल्ली विमानतळावरून बोलत असल्याचे, शासकीय अधिकारी असल्याचे सांगणारे फोन येणे सुरू झाले. त्यांनी अमेरिकेतून आलेल्या पार्सलमध्ये आक्षेपार्ह गोष्टी असल्याने कारवाईचा धाक दाखवून त्यांच्याकडून ५० लाख रुपये उकळले. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार केली.