नामदेव मोरे, नवी मुंबईमहापालिकेच्या निवडणुका होवून सहा महिने झाल्यानंतरही अद्याप प्रभाग समित्यांची रचना झालेली नाही. आॅगस्टमध्ये घाई गडबडीमध्ये केलेल्या रचनेस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. दोन महिन्यांनंतरही स्थगिती कायम असल्यामुळे प्रभागांमधील विकासकामे ठप्प झाली असून नगरसेवकांनी राज्य शासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिलमध्ये झाल्या आहेत. ९ मे रोजी महापौरांची निवड करण्यात आली. त्यानंतर एक महिन्यामध्ये प्रभाग समित्यांची नियुक्ती होणे आवश्यक होते. यापूर्वीच्या पंचवार्षिकमध्ये सहा प्रभाग समित्या होत्या. यावेळी नगरसेवकांची संख्या १११ असल्यामुळे ८ समित्यांची रचना केली आहे. २० आॅगस्टमध्ये झालेल्या तहकूब सर्वसाधारण सभेमध्ये प्रभाग समित्यांची रचना केली होती. परंतु तहकूब समित्यांमध्ये आयत्या वेळचे विषय आणता येत नसल्याचे सांगत शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला होता. बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेवून थेट आयुक्त दिनेश वाघमारे यांना फोन करून स्थगिती दिली होती. दोन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी अद्याप स्थगिती उठविलेली नाही. यामुळे अद्याप प्रभाग समित्यांची फेररचना होवू शकलेली नाही. महापालिकेने अनावश्यक खर्च कमी केला आहे. मोठे प्रकल्प या वर्षात सुरू केले जाणार नाहीत. यामुळे नगरसेवकांना प्रभाग समिती व नगरसेवक निधीचा आधार होता. निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवारांनी नागरिकांना प्रचंड आश्वासने दिली होती. परंतु प्रभाग समित्यांची रचनाच नसल्यामुळे एकही काम करता आलेले नाही. आयुक्तांच्या अधिकारामध्ये काही ठिकाणी कामे झाली आहेत. परंतु सर्वच प्रभागांमध्ये कामे झालेली नाहीत. प्रत्येक नगरसेवकाला १० लाख व प्रभाग समितीसाठी ४० लाख रुपयांचा निधी असतो. सहा महिन्यांमध्ये यामधील एकही रुपया खर्च केलेला नाही. प्रभागामधील गटारावरील झाकणे बसविणे, पदपथांची किरकोळ दुरुस्ती व इतर अत्यावश्यक कामे या निधीमधून करता येतात. परंतु सर्वच कामे ठप्प झाल्यामुळे नगरसेवकही हतबल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ स्थगिती उठवावी व लवकरात लवकर प्रभाग समित्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक करू लागले आहेत. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रभाग समित्यांच्या रचनेस नगरविकास खात्याने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठली की लगेच समित्यांच्या रचनेचे काम केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रभाग समित्या रखडल्या
By admin | Updated: October 29, 2015 23:52 IST