लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पायी चाललेल्या महिलेकडील दोन चिमुरड्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना नेरुळमध्ये घडली आहे; परंतु वेळीच महिलेने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी केलेल्या मदतीमुळे अपहरणकर्त्याचा डाव फसला आहे. या अपहरणकर्त्याला नागरिकांनी पकडून नेरुळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.नेरुळ येथील सारसोळे डेपोलगत शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला आहे. आरती पाटील या त्यांचा मुलगा कृष्णा (०४) व त्या ज्यांच्याकडे काम करतात त्या सुनील पाटील यांची मुलगी दक्षता (०४) या दोघांना घेऊन रस्त्याने चालल्या होत्या. दोघेही प्लेस्कूलमध्ये शिकत असून दररोज सकाळी आरती पाटील त्यांची ने-आण करायच्या. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी त्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन रस्त्याने चालल्या असताना, समोरून आलेल्या एका व्यक्तीने दोन्ही मुलांना हिसकावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सदर व्यक्तीने आरती पाटील यांना धक्का देऊन मुलांना उचलून पळ काढताच, त्यांनी आरडाओरडा केला. त्यांनी मदतीसाठी दिलेली हाक ऐकताच परिसरातील काही व्यक्तींनी त्या ठिकाणी धाव घेत, मुलांना घेऊन पळणाऱ्या व्यक्तीला पकडले. या वेळी त्याने नागरिकांसोबतही धक्काबुक्की करून पळण्याचा प्रयत्न केला असता, जमावाने त्याला चोप दिला. तसेच संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत त्याचे नाव रामसुख रामजीयामन असल्याचे समोर आले. त्याच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याने दोन्ही मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न कशासाठी केला, याचा उलगडा अद्यापपर्यंत झालेला नाही.
दोन चिमुरड्यांच्या अपहरणाचा प्रयत्न
By admin | Updated: July 9, 2017 02:14 IST