- कमलाकर कांबळे, नवी मुंबईटीटीसी क्षेत्रातील एमआयडीसीच्या सुमारे ३00 एकर जमिनीवर अतिक्रमण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत शेकडो कोटींच्या घरात आहे. त्यामुळे भूमाफियांच्या तावडीतून ही जमीन मुक्त करण्याचे मोठे आवाहन एमआयडीसी प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. अशिया खंडातील सर्वात मोठी औद्यागिक वसाहत म्हणून टीटीसी क्षेत्राची ओळख आहे. सुमारे २५ किमी क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या औद्योगिक वसाहतीच्या नियोजनात एमआयडीसी प्रशासनाला पुरते अपयश आल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून मागील १० वर्षांत या परिसरात भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. मोकळ्या जागा बळकावून त्यावर टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहे. नवी मुंबईत सर्वाधिक झोपड्या एमआयडीसीच्याच जागेवर आहेत. व्यावसायिकांनीही अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात जागा बळकावल्या आहेत. अतिक्रमणांच्या माध्यमातून भूमाफियांनी एमआयडीसीची सुमारे ३00 एकर जमीन गिळंकृत केली आहे. एका जनहित याचिकेवर एमआयडीसीने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब स्पष्ट झाली आहे.पूर्वी या औद्योगिक वसाहतीला रस्ते, पाणी, वीज व इतर प्राथमिक सुविधा एमआयडीसीकडून पुरविल्या जात होत्या. परंतु सन २00५ पासून या सुविधा महापालिकेडे वर्ग करण्यात आल्या आहेत. असे असले तरी या क्षेत्रातील बहुतांशी जमीन एमआयडीसीच्या मालकीची आहे. त्यामुळे तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा एमआयडीसी प्रशासनाचीच आहे. असे असले तरी गेल्या १० वर्षांत भूमाफियांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने एमआयडीसीकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. वाढत्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा उभारण्यात आली नाही. ही बाब भूमाफिया आणि झोपडपट्टीदादांच्या पथ्यावर पडल्याने शेकडो कोटींच्या जमिनीवर पाणी सोडण्याची वेळ एमआयडीसीवर आली आहे.दिघ्यातील ९४ पैकी ९0 बांधकामे एमआयडीसीच्या जागेवर उभारली आहेत. या सर्व बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीने या बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम छेडली आहे. असे असले तरी या बेकायदा इमारतींनी किती क्षेत्र व्यापले आहे, याचा तपशील एमआयडीसीकडे उपलब्ध नसल्याचे समजते.
टीटीसीत ३00 एकर जमिनीवर अतिक्रमण
By admin | Updated: October 8, 2015 00:55 IST