- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पाणीटंचाई निवारण्याकरिता विहिरी, कूपनलिकांचे हे स्रोत पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून आहे. याबाबत सभागृह आणि बाहेर फक्त चर्चाच होत आहे. पूर्वी नगरपालिका आणि आता महापालिकेकडून याविषयी ठोस पावले उचलण्यात येत नाही. म्हणून पनवेलकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सिडको वसाहती आणि २९ महसुली गावांचा समावेश आहे. देहरंग धरणातील बारा एमएलडी पाण्याव्यतिरिक्त महापालिकेच्या मालकीचा दुसरा स्रोत नाही.पनवेल, नवीन पनवेल आणि कळंबोली वसाहती एमजेपीवर अवलंबून आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण टाटा पॉवरने सोडलेले पाणी उचलते आणि तेच सिडको वसाहतींना पुरवते. मात्र सुटीच्या दिवशी हा प्रकल्प बंद असल्याने नदीत पाणी येतच नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पनवेलकरांना कमी पाणी मिळते. जुनाट झालेल्या जलवाहिन्यांमुळे मागणीप्रमाणे पाणी मिळत नाही. देहरंग धरण आटले असल्याने येथून पाणी मिळत नाही. त्यामुळे पनवेल शहराला पाणीटंचाई जाणवू लागली आहे.त्यात एमजेपी आणि एमआयडीकडून पाणीपुरवठा कमी झालाय. समाविष्ट केलेल्या अनेक गावांमध्ये पाण्याचा कोणताही स्रोत नाही. ती गावे बोअरवेलवर अवलंबून राहतात. एकंदरीतच कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा याकरिता एक स्वतंत्र धरण घेण्याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे.मात्र ही बाब धोरणात्मक असल्याने त्याला विलंब लागेल. म्हणून तात्पुरती उपाययोजना म्हणून पनवेल महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील विहिरी आणि कूपनलिकेतील पाण्याचा वापर करणे सयुक्तिक ठरेल अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी या अगोदरच सभागृहात केली होती. या स्रोताची साफसफाई केली तर टंचाई निवारण्याकरिता त्याचा चांगला वापर होवू शकते हे त्यांनी पटवून दिले आहे.गेल्या काही दिवसांपासून पाणीप्रश्नावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.विहिरी आणि कूपनलिकांचा मुद्दाही प्रकर्षाने पुढे आला आहे. महापालिका प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे.परंतु याबाबत कार्यवाही होताना दिसत नाही.पनवेल नगरपालिका, ग्रामपंचायत अस्तित्वात होती त्यावेळी सुध्दा याबाबत चर्चा होती. मात्र ठोस पावले उचलण्यात आली नाहीत त्यामुळे पनवेलकरांना पाण्याची कमतरता भासत आहे.जुन्या विहिरी आणि बोअरवेल या जलस्रोताचा वापर करण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आहे. साफसफाई, गाळ काढण्याचे काम करावे लागणार आहे. त्याकरिता आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. आम्ही एमजेपीकडून तीनपेक्षा जास्त एमएलडी पाणी वाढवून घेतले आहे. त्यामुळे फारशी टंचाई निर्माण होणार नाही.- जमीर लेंगरेकर,उपायुक्त,पनवेल महानगरपालिका
पाणीटंचाईवर विहिरी, कूपनलिकांची मात्रा कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 06:56 IST